पुणे – विवाहानंतर दाम्प्÷यआने एकमेकांना समजून घेणे फारच गरजेचे असते. जोडीदारावर सतत संशय घेणे आणि तापट, हट्टी स्वभाव असेल, तर अशा वैवाहिक जीवनाची संध्याकाळ लवकर होते. हे टाळायचे असेल, तर समुपदेशनाची खरी गरज आहे.
रवी काका मनोजला घेऊन स्वतःहून भेटायला आले. आल्यावर त्यांनी प्रथम मनोजची ओळख करून दिली. मनोज खूपच तणावाखाली वाटत होता. तो एकदम ताणाखाली असल्याचे जाणवतच होते. मनोजचं चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. पण या चार महिन्यांतच त्याच्यात व त्याच्या बायकोबरोबर भांडणं होऊ लागली. त्यामुळे मनोज खूप तणावाखाली होता. मनोज आणि त्याच्या पत्नीत खूपच वाद व्हायचे. ती सतत मनोजशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडायची.
त्यामुळे मनोजला असे वाटायचे की तिच्यापासून घटस्फोट घ्यावा. पण त्यापूर्वी त्याला काका म्हणजे मनोजचेच वडील भेटायला घेऊन आले. काकांचं बोलणं होईपर्यंत मनोज एकदम शांत, मान खाली घालून शांत बसून राहिला होता. तो काहीच बोलायला तयार नव्हता. आजही त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. म्हणून तो ताणाखाली होता.
काकांशी आणखी संवाद साधून झाल्यावर मनोजशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण मनोज फारसे काहीच बोलला नाही. विचारलेल्या प्रश्नांची त्याने जेमतेम उत्तरे दिली व तो शांत बसला. त्याचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने या सत्राच्या शेवटी संवाद साधला. पण तो काही बोलण्याच्या मनःस्थितीत नसल्याने त्याने पुढील भेटीत बोलण्याची तयारी दाखवली. त्यामुळे हे सत्र येथेच थांबवून पुढील सत्र निश्चित केले.
ठरल्याप्रमाणे मनोज एकटाच पुढील सत्रास भेटीसाठी आला. या सत्रात तो बराच शांत होता आणि त्याने बोलायचीही तयारी दाखवली. मनोज एका आय.टी. कंपनीत काम करतो. मला बराच चांगला पगार आहे. पण त्यामुळे मला कंपनीत जास्त वेळ देणं मला भाग आहे. या गोष्टीची कल्पना मी तिला लग्नाआधीच दिली होती. तेव्हा तिने मला चांगला प्रतिसाद दिला. मी समजू शकते. मला काही हरकत नाही, असं तिने सांगितलं. म्हणून तर आम्ही पुढचा विचार केला व लग्न केलं. पण आता मात्र ती या मुद्यावरून माझ्याशी सतत भांडते. माझ्यावर संशय घेते. तिला असं वाटतं की, मी बाहेर कोणालातरी भेटतो.
माझे बाहेर कोणाशीतरी प्रेमसंबंध आहेत. म्हणून मी मुद्दामहून उशिरा येतो आणि तिला वेळ देत नाही.’ मी तिला खूप पद्धतीने समजावले. आई-बाबांनीही तिला खूप समजावलं. पण तिचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. ती आई-बाबांशीही भांडते ते मला अजिबात आवडत नाही. तसेच तिला शॉपिंग करायलाही खूप आवडते. त्यासाठी ती सतत पैसे मागत राहते. सतत शॉपिंग करणं हा तिचा छंद आहे. त्याबद्दलही आम्ही काही बोललं की तिला लगेच राग येतो. चिडली की 2-3 दिवस घरातल्या कोणाशी बोलत नाही की घरात काही काम करत नाही. सगळा ताण आईवर येतो. पण ती समजावलं तरी ऐकत नाही.
तिच्या माहेरी ती एकटीच असल्याने खूप लाडात वाढलीये. तिथे तिचे सगळे लाड पुरवले जातात. पण इथे देखील तिला तेच अपेक्षित आहे. आता तुम्हीच सांगा हे कसं शक्य आहे. मला या सगळ्याचा कंटाळा आलाय. माझा सगळा पगार तिच्या खरेदीतच खर्च होऊन जातो. मनोजशी अजून थोडं बोलल्यावर हे सत्र थांबवून पुढच्या सत्रात तिला घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या सत्रात ती मनोजबरोबर आली. पण या सत्रात ती मनोजशी खूप भांडली. त्यामुळे हे सत्र थांबवून पुढील सत्रात तिला एकटीला बोलावण्यात आले.
तिची इच्छा नव्हती. पण मनोजच्या आग्रहामुळे ती नाईलाजाने भेटायला आली. या सत्रात प्रथम विश्वास संपादनाच्या दृष्टीने तिच्याशी संवाद साधला व नंतर मूळ मुद्यावर चर्चा केली. या चर्चेत तिचा स्वभाव हट्टी असल्याचे लक्षात आल्याने तसेच स्वभाव तापट असल्याचेदेखील लक्षात आले व याच कारणांमुळे मनोच व तिच्यात भांडणे होत होती हे लक्षात आले. त्यामुळे पुढील सत्रांमध्ये मानसशास्त्रीय उपचार पद्धतीमधील वेगवेगळी तंत्र वापरून तिला हळूहळू तिच्या या स्वभावाची जाणीव करून दिली.
अर्थातच या सगळ्याला सुरुवातीला तिचा विरोधच होता. आपल्या स्वभावातील हे भाग मान्य करणे तिला अवघड जात होते. परंतु सत्रांदरम्यानच्या उपचार पद्धतीमुळे तिच्या हे लक्षात आले व तिने बदल करण्याची तयारी दाखवली. अर्थात यासाठी तिला बराच वेळ लागला. पण तिने नेटाने प्रयत्न करून हा स्वभाव बदलला. त्यामुळे मनोज, धरचे व तिची भांडणे, वाद कमी झाले व त्यांचा संसार वाचला.
(केसमधील नावे बदलली आहेत.)
– मानसी चांदोरीकर