दुपारची वेळ ही माझी वाचनाची वेळ. या वेळेत मी कोणतेही पुस्तक घेऊन वाचून काढते. नोटस् काढते किंवा अभिप्राय लिहिते. परवा असेच शाळेमध्ये कथाकथन स्पर्धेत बक्षीस म्हणून मिळालेले “गुलबकावली’चे पुस्तक हाती लागले आणि मन लगेचच माझ्या शाळेत जाऊन पोचलेसुद्धा. ती कथाकथन स्पर्धा, स्पर्धेत सादर केलेली सिंदबादची गोष्ट, त्यासाठी बक्षीस म्हणून मिळालेले गुलबकावलीचे पुस्तक… आणि हो! त्या पुस्तकासाठी खाल्लेला मारही आठवला. तर या आणि अशा अनेक आठवणींनी फेर धरत माझ्याभोवती आपले वारूळ बांधायला चालू केले. माझी अख्खी दुपार त्या आठवणींनी भारून टाकली. कित्तीतरी आठवणी… खरंच आपल्या या आठवणी आपल्यासाठी टॉनिक असतात ना! असंच एकदा बेट्टी मेहमुदीचे “नॉट विदाऊट माय डॉटर’ हे पुस्तक हाताशी लागले. एका अख्ख्या बैठकीत ते पुस्तक वाचून काढलं. एका आईने आपल्या मुलीच्या सुटकेसाठी केलेला संघर्ष नंतर कितीतरी दिवस मनात घोळत राहिला. हे आणि असे अनेक क्षण, प्रसंग आपल्या जगण्याचे साक्षीदार बनत जातात.
बरेचदा वळवाच्या पावसासारखे आठवणींचे कप्पे रिकामे होऊ लागले की, मग मात्र आपली धांदल उडते, त्या आठवणींचे मखमली रंग जपण्यासाठी अन् त्यांच्यात पुन्हा रंगून जाण्यासाठी. त्या साऱ्या आठवणींच्या चिमण्या गोळा करताना आपणही त्या चिवचिवाटात हरवून जातो. या आठवणींचे असेच असते. एखादा सोफ्याचा कोपरा, कपातली संपत आलेली कॉफी, ओसरीतला घुंगुरवाळा झोपाळा किंवा कातरशी संध्याकाळही. या आठवणी दाटण्याची हक्काची ठिकाणं. त्यात अवेळी बरसलेली एखादी सर किंवा रिमझिमत्या स्वरातलं एखादं गाणं असेल तर मग बघायलाच नको. आठवणींचा सोनेरी पिंपळ बहरलाच म्हणून समजावं. त्या पिंपळाच्या जाळीदार पानावर रेंगाळतं आपलं बालपण, तारूण्य आणि त्यात रुजलेले आठवणींचे क्षण.
आमच्या गावाला वळसा घालून जाणारी नदी आणि तिच्या काठावरचा पिंपळाचा पार, शेजारचे विठ्ठल मंदिर याभोवती माझ्या अनेक आठवणी गुंफल्या आहेत. संध्याकाळी तिथे पारावर कीर्तन रंगे तेव्हा अनेक पांडुरंग मला त्यात तल्लीन झालेले दिसत. एखाद्या तलखीच्या दुपारी ओढ्याकाठच्या चुबळक पाण्यात उतरून पकडलेली चंदेरी मासोळीची सळसळ आणि खंड्या धिवराचे सूर आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहतात. सागर किनाऱ्यावर विखुरलेल्या शंखशिंपल्यांसारख्या या आठवणी आपल्या मनाच्या किनाऱ्यावर विखुरलेल्या असतात. जी हवी ती आठवणीची शिंपली वेचायची आणि हरवून जायचं त्या आठवणींत.
आपल्या सगळ्यांच्याच आठवणी आपण मनात जपून ठेवतो. त्यांना कोंदण देतो. लहानपणापासून ते अगदी आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंतही आठवणींची पिसे आपल्यावर रमल करत राहतात. आपले अस्तित्व जपतात. आठवणी आहेत म्हणून जगण्याचे रंग टिकून राहिले आहेत. आठवणी ही परमेश्वराने माणसाला दिलेली सुंदर गोष्ट आहे.
सगळ्याच आठवणी रम्य असतात असे नाही. काही काही अगदी नकोशाही असतात. काही भितीदायक, काही आर्त तर काही आपलीच हुर्रे उडवणाऱ्या असतात. पण तरीही हव्याहव्याशा वाटतात. आयुष्याचे धडे देऊन जातात. एखादे गुपित एखादे मोरपीस किंवा एखादा सतत ताजा राहणारा ओरखडा या आठवणी आपल्याला देतात.
आपल्याला जगण्याचे कौशल्य शिकवतात. प्रसंगी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड थोडक्यात मितवा होतात. अन् आयुष्याची वाटचाल सुखद बनवतात. म्हणूनच आठवणी विसरण्यापेक्षा त्या आठवाव्यात. त्यांच्याशी मैत्र जोडावे. खोलवर श्वास भरून घ्यावा आणि जोडून घ्यावे स्वतःला त्यांच्यासोबत. या आठवणींचा, अनुभवांचा उपयोग आयुष्य संप्पन्न करण्यासाठी करावा.
आठवणींसोबत रमताना
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं,
रचावी एखादी कवितेची ओळ
आपणच आपल्यासाठी.
मनाच्या कडेला रुजवावेत थोडेसे श्वास
अन् जपावेत त्यांत आठवणींचे भास.
हृदयात देऊन थोडासा ठाव
आपणच जपावा आठवणींचा गाव…
मानसी चिटणीस