सर्व मुलांना आपला बाप प्यारा असतो. रावांच्या मुलांना मागेल ते मिळत असल्याने हट्ट माहीत नसतो तर रंकाच्या मुलांना हट्ट करायचा नसतो हे माहीत असते.
गणेशचा बाप सुतारकाम करायचा. त्याला त्याच्या चारही बहिणींच्या संसाराला हातभार लावायला लागायचा. त्यामुळे त्याच्या दोन मुलांची ओढाताण होत असे. गणेश नेटाने शाळा शिकत होता. आजूबाजूची मुले मिळून एकत्रच शाळेत जायची. जाताना रिकाम्या डबड्याला लाथा मारत ते शाळेपर्यंत नेत. कुठे गाढवाच्या शेपटीला डबा बांध, मारकुट्या मास्तरच्या खुर्चीला चुईंगम लाव, मास्तरच्या सायकलची हवा सोड, अशा गमतीजमती चालायच्याच.
शाळेचे मैदान मोठे होते. मुले आटापाट्या, कबड्डी मनसोक्त खेळायची. वार्षिक आंतरशालेय स्पर्धा जिंकून देणारे बिनीचे खेळाडू. अशा स्पर्धांना कॉन्व्हेंट शाळेचे विद्यार्थी पालकांसह रुबाबात यायचे. आईबाप पोरांच्या खाऊच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या घेऊन येत. त्यांचाच आरडाओरडा जास्त. शिरप्या आणि कंपनी स्पर्धा जिंकायचीच. उच्चभ्रू शाळेच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी यायच्या. “सर, त्या शाळेच्या संघात दरवर्षी तेच खेळाडू.’ इरसाल मास्तर भाबड्या चेहऱ्याने विचारायचे, “पोरगं पास झालं नाही की त्याच वर्गात राहणार ना?’
मुलांना वाटायचं आपण दरवर्षी जिंकतो तरी आपला बाप एकदाही येत नाही. गण्याने बापाकडे विषय काढला. “बा, शाळांच्या वार्षिक स्पर्धेला तुम्ही कोणीच येत नाही. दुसऱ्या शाळेच्या पोरांचे आईबाप येतात. आम्ही शाळेला बक्षीस मिळवून देतो. एकदा तरी या की!’ बाप गण्याला जवळ घेऊन म्हणाला, “आम्ही रोजंदारीवर आहोत. खाडा करून चालत नाही रे!’ वार्षिक परीक्षेत मुले पास झाली की पालक खूश! मार्कांची चर्चा व्हायची नाही. आपल्या पाल्याला गणित, इंग्रजी विषयाच्या शिकवणीची जरूर आहे अशा चिठ्ठ्या घरी येत नसत. मुले शिक्षणाच्या ओझ्याखाली दबली नव्हती.
त्यावेळी शाळा अकरावीपर्यंत होती. बापाच्या मदतीला जावं लागलं म्हणून शिरप्या नववीत गळाला. दहावीत आजारी बापामुळे हणत्यानं शाळा सोडली. शाळा सुटण्याला अभ्यास न येणं एवढच एक कारण नसतं. नादारी असूनही मुलांनी शाळा सोडली. कुटुंबाला हातभार लावणं ही काळाजी जरूर होती.
गणेश अकरावीपर्यंत पोहोचला. चंदू गळाला. एक दिवस चंद्याने गणेशला गाठले.
“गण्या, तुझ्या बापाचा भाऊ त्याच्यासारखा दिसतो का रे?’
“त्याला भाऊच नाही. का रे?’
चंद्याने कुजबुज केली.
“छे छे माझा बाप असा नाही.’
अकरावीला गणेशची शाळा संपली. तो बापाला मदत करू लागला. लाकूड बाजारातून लाकडे आणणे, रंधा मारणे, फर्निचर करून ते विकणे आणि वसुलीला जाणे ही कामे गणेश शिकला. बोलता बोलता चार-पाच वर्षे गेली. काम करता करता बाप लेकाकडे मन मोकळे करू लागला.
“लहानपणी मी मिलिटरीच्या शाळेत भरती झालो होतो.’ “ऑ, मग तुला काढले का रं बा?’
“नाही रे! माझ्या बापाने त्याच्या कुटुंबाला हातभार लावायला म्हणून मला ट्रेनिंगमधूनच परत आणले. मी अजूनही माझ्या बहिणींचाच संसार बघतोय. त्यामुळं तुमच्याकडे लक्ष देता आले नाही.’ बाप आपले नशीब पोराला सांगत होता. गणेशने हळूच विचारले, “बा तू आकडा लावायचा का रं?’ बापाने सुस्कारा सोडला.
“अरे, संसाराला हातभार लावायला कधीतरी नशीब अजमावून पाहायचो.’ चंद्याची माहिती खरी ठरली. आपला बाप विवश आहे. पण खोटा नाही, हे गणेशला जाणवले. तो गप्प झाला. “बाबा, तुझ्या नशिबाने तुला साथ दिली नाही, पण माझे नशीब मला साथ देते,’ बापाला हे सांगण्याचा धीर गणेशमध्ये नव्हता. त्याचा बाप तेथून निघून जाऊ लागला. गणेश आपल्या बापाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघतच राहिला…
श्रीकृष्ण केळकर