चंडीगढ – पंजाबमध्ये तोंडावर आलेल्या पालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाने भाजपचे राजकीय टेन्शन वाढवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पंजाबचे राज्यपाल व्ही.पी.सिंह बदनौर यांची बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा आणि त्या पक्षाच्या काही नेत्यांनी भेट घेतली. त्या भेटीत पालिका निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. त्यासाठी भाजप नेत्यांनी पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचे कारण पुढे केले.
राज्यात असुरक्षिततेची स्थिती निर्माण होत आहे. शांततामय वातावरणाची निश्चिती झाल्यानंतरच पालिका निवडणुका व्हाव्यात, अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली. त्या मागणीची पंजाबचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अमरिंदर सिंग यांनी खिल्ली उडवली. केंद्रीय कृषी कायद्यांमुळे जनता संतापली आहे. अशात निवडणुकांना सामोरा जाण्याचा धसका भाजपने घेतलेला दिसतो, अशी प्रतिक्रिया अमरिंदर यांनी दिली.
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर महिनाभरापेक्षा अधिक काळपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी सहभागी झाले आहेत. त्या दोन्ही राज्यांमध्येही निदर्शने होत असल्याने भाजप नेत्यांची पंचाईत होत असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे.