लखनौ – उत्तरप्रदेशचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू त्यांना पोलिसांकडून वारंवार अटक केली जात असल्याने व्यथित झाले आहेत. त्यातून त्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने असणाऱ्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात असल्याचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले आहे.
भाजपशासित उत्तरप्रदेशात ऑक्टोबर 2019 मध्ये कॉंग्रेसने लल्लू यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. त्यानंतर त्यांना निदर्शनांवेळी किंवा जाहीर कार्यक्रमांवेळी पोलिसांनी अटक केल्याच्या किंवा ताब्यात घेतल्याच्या बातम्या सातत्याने येत असतात.
आता त्या अटकसत्रावर नाखुष असलेल्या लल्लू यांनी राष्ट्रपतींना साकडे घातले आहे. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आतापर्यंत 23 वेळा अटक झाल्याचा दावा केला आहे.