देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असणाऱ्या आणि सध्या विरोधी बाकावर बसून विरोधी पक्षाची कामगिरी करणाऱ्या कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची शनिवारी राजधानी नवी दिल्लीत बैठक होऊन आगामी काळात पक्ष कसा चालवावा, याबाबत विचारमंथन झाले.
ही खरोखरच स्वागताची बाब म्हणावी लागेल. 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचे संपूर्णपणे पानिपत झाल्याने या पराभवाच्या मानसिकतेतून वर येण्याची पक्षाची आणि पक्षाच्या नेत्यांची तयारीच नव्हती, असे चित्र तयार होत असतानाच कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने ही बैठक होऊन त्यात नवीन वर्षामध्ये पक्षसंघटना अधिक सकारात्मकपणे कशी चालवायची याबाबत विचारमंथन झाले. ही समाधानाची बाब आहे.
या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये कॉंग्रेस पक्षातील 23 प्रमुख नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षसंघटनेबाबत नाराजी व्यक्त केली होती आणि लवकरात लवकर पक्षाला पूर्णकालीन अध्यक्ष मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. कॉंग्रेस पक्ष हा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष असला, तरी पक्षातील प्रमुख नेत्यांनी पाठवलेल्या या पत्राकडे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संपूर्णपणे डोळेझाक केली होती.
मात्र, आता शनिवारी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्यात हे पत्र पाठवणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते, हे विशेष मानावे लागेल. या नेत्यांनी त्यावेळी जे मत पत्रामध्ये व्यक्त केले होते त्यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि या नेत्यांच्या अपेक्षांचा विचार गांभीर्याने करण्याचे आश्वासन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिले आहे, असेही समजते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी राहुल गांधी यांनी तयारी दर्शवली आहे.
पक्षात जी काही जबाबदारी आपल्यावर सोपवली जाईल ती आपण पार पाडू, अशा स्पष्ट शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी आपली तयारी दर्शवली असल्याने कॉंग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न नजीकच्या काळात सुटेल, असे मानायला हरकत नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांना पक्षाचा प्रमुख म्हणून गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे जाता येत नाही ही बाब यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली असली तरी राहुल गांधी यांच्यासारखा तरुण नेता पक्षाची धुरा सांभाळण्यास तयार होत आहे, ही त्यासाठी महत्त्वाची बाब आहे.
खरेतर 2014 ची लोकसभा निवडणूक कॉंग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय ताकदीने आणि संघर्षाने लढला होता. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला आणि त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्येही कॉंग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली असल्याने या पराभवानंतर राहुल गांधी एकदमच मागे पडले.
पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला, त्यामुळेच सोनिया गांधी यांच्या खांद्यावर हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आता वर्षभरानंतर राहुल गांधी पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येऊन पक्षसंघटनेची जबाबदारी घेण्यास तयार होत आहेत, ही खरोखरच स्वागताची बाब आहे. अर्थात, पक्षातील काही नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे पक्षाचा अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया घेऊन निवडला जावा. त्या मागणीलाही राहुल गांधी यांची तयारी आहे.
कॉंग्रेस पक्षात पूर्वी अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असे. अतिशय आरोग्यपूर्ण वातावरणात निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असे. कॉंग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा तसे वारे वाहणार असेल तर, तीसुद्धा चांगली गोष्ट आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीतील या विचारमंथनातून अजून एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे देशातील प्रत्येक राज्यामध्ये नेतृत्व उभे करणे महत्त्वाचे आहे. कॉंग्रेसची पक्षसंघटना सध्या सरचिटणीस तत्त्वाचा वापर करून चालते. म्हणजेच प्रत्येक सरचिटणीसला विशिष्ट राज्याची जबाबदारी देण्यात आलेली असते. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून जो काही नेता असतो तो निवडणुकीच्या राजकारणात प्रभावी ठरत नाही, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे.
कॉंग्रेस पक्ष संघटनेनेही आता प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्षांना बळ देऊन त्याच्यावर विश्वास दाखवायला हवा, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले, हेही महत्त्वाचे आहे. त्या त्या राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवायचे असेल आणि केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी त्या त्या राज्यात लोकसभा निवडणुकीतही चांगले यश मिळवायचे असेल तर प्रदेश पातळीवर चांगले नेतृत्व उभे करणे योग्य ठरते.
भाजपने अशाच प्रकारच्या कार्यपद्धतीवर बहुतेक राज्यांमध्ये आपले वर्चस्व वाढवले आहे, ही गोष्ट आता कॉंग्रेसच्याही लक्षात आली, हे बरे झाले. प्रदेश पातळीवर प्रभावी नेतृत्व आणि केंद्रीय पातळीवर सगळ्यांना सामावून घेणारे आणि बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व अशी रचना असेल तरच कोणत्याही पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात यश मिळू शकते. कॉंग्रेसला आता त्याच प्रकारे वाटचाल करावी लागणार आहे आणि तसे संकेत कॉंग्रेसच्या या विचारमंथनातून समोर आले आहेत, हे महत्त्वाचे आहे.
देशातील राजकारण कॉंग्रेसने खरोखरच गांभीर्याने घेतले आहे हे सिद्ध करणारी आणखी एक गोष्ट गेल्या दोन दिवसांत घडली होती, ती म्हणजे सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले पत्र. या पत्रात सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील वंचित समाजाच्या समस्या सोडविण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांना केले होते.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा कॉंग्रेस घटक पक्ष असूनही कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्या म्हणून सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करून या सर्व विषयाकडे गांभीर्याने बघत आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील सर्वात जुना तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष म्हणून ज्या कॉंग्रेस पक्षाची ओळख होती, त्या पक्षाकडून अजूनही देशातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होऊनच त्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत.
कॉंग्रेस पक्षाची आगामी रणनीती निवडणुकीच्या राजकारणात कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्याची असेल अशी आशा करायला हरकत नाही. कॉंग्रेस नेत्यांच्या या विचारमंथनातून भाजपला निवडणुकीत हरवण्याचे एखादे शस्त्र कॉंग्रेस नेत्यांच्या हाती लागेल, अशीही अशा यानिमित्ताने करावी लागेल.