नवी दिल्ली – विवाहपूर्व काळात अनेक महिला परपुरुषाशी शरीरसंबंध ठेवतात, असे आढळून येते; कारण अशा महिलांना सदर पुरुषाने विवाहाचे वचन दिलेले असते. मात्र, नंतर काही कारणाने हा विवाह हो ऊ शकला नाही, तर अशा महिला त्या पुरुषाविरोधात बलात्काराचा अथवा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करतात. मात्र, विवाहाच्या वचनाला अथवा आमिषाला बळी पडून एखाद्या महिलेने कोणाशी लैंगिक संबंध ठेवले, तर तो बलात्काराचा गुन्हा मानता येणार नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायलयाने दिला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात एका महिलेची याचिका फेटाळली आहे; ज्यामध्ये तिने लग्नाचं वचन देऊन शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तीच्या सुटकेला आव्हान दिलं होतं. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालायने सांगितलं की, लग्नाचं वचन देऊन शरिरसंबध ठेवण्याला बलात्कार म्हटलं जाऊ शकत नाही.
न्यायमूर्ती विभू बाखरु म्हणाले की, जर पीडिता काही क्षणात शरीरसंबंध ठेवण्यास तयार झाली असेल तर लग्नाचं अमिष दाखवून ते ठेवल्याचं आपण म्हणू शकतो. तसंच काही प्रकरणांमध्ये महिलेची इच्छा नसतानाही लग्नाचं वचन महिलेला शरिरसंबंध ठेवण्यास प्रेरित करु शकतं. केवळ अशा प्रकरणांमध्ये लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचं आपण म्हणू शकतो. कलम 375 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा ठरु शकतो. पण जेव्हा दीर्घ काळासाठी शारिरीक संबंध ठेवले गेले असतील तेव्हा ते ऐच्छिक आणि लग्नाच्या आशेपोटी ठेवण्यात आल्याचं सिद्ध होतं.
न्या. बाखरु यांनी यांनी यावेळी ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला.