नवी दिल्ली – जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या खेळाडूंना तसेच प्रशिक्षकांना करोनावरील लस उपलब्ध झाल्यावर प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासान केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी दिले आहे.
मार्चमध्ये करोनाचा धोका जगभरात पसरल्यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आली. ही स्पर्धा आता येत्या 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे जे खेळाडू पात्र ठरले आहेत, तसेच त्यांना प्रशिक्षण देत असलेल्या प्रशिक्षकांना ही लस उपलब्ध झाल्यावर प्राधान्याने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताचे सर्वात मोठे पथक सहभगी होत आहे. ज्या खेळाडूंनी यापूर्वी झालेल्या पात्रता स्पर्धेतून पात्रता मिळवली तसेच पुढील काळात होत असलेल्या अशाच स्पर्धांमधून जे खेळाडू पात्रता मिळवतील त्यांना त्यांच्या प्रशिक्षकांसह ही लस देण्यात येणार आहे, असेही रिजीजू यांनी सांगितले.
हजारो कोटींचा पुन्हा खर्च
करोनामुळे ही स्पर्धा एक वर्षांने लांबणीवर पडल्याने आता पुन्हा नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी पुन्हा एकदा जवळपास दोन हजार कोटी खर्च होणार आहे. स्पर्धा पुढे गेल्यामुळे सर्व सुविधांची नव्याने सज्जता करण्यात येणार आहे. त्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. स्पर्धेसाठी मुळातच यापूर्वी जवळपास 1200 कोटी खर्च करण्यात आले होते.