पुणे -राज्यात हवामान कोरडे असल्याने काही प्रमाणात थंडी वाढण्यास सुरूवात झाली असून, जिल्ह्यातही काही प्रमाणात थंडी जाणवत आहे.
उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ लागला आहे. विदर्भाच्या पूर्व भागात थंडीने पुन्हा जम बसविला आहे. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हवामान कोरडे असल्याने काही प्रमाणात गारठा वाढला आहे. शहरातही पहाटे आणि सायंकाळी थंडी जाणवत आहे.
हवामान विभागाच्या नोंदीनुसार मंग़ळवारी शहरात कमाल तापमान 30.1 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दरम्यान बंगालच्या उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे.
त्याची तीव्रता येत्या पुढील चोवीस तासात आणखी वाढणार असून, वारे वायव्येच्या दिशेकडे असलेल्या तमिळनाडू व पॉंडेचेरी, कारीकल आणि ममल्लापुरम या भागाकडे सरकणार आहे.
त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांवर होणार आहे. यामुळे या भागात आगामी दोन दिवसानंतर राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आला आहे.