चंडीगढ, दि.12 -पंजाबमधील शेतकरी संघटना केंद्र सरकारशी चर्चा करण्यास राजी झाल्या आहेत. आता उद्या (शुक्रवार) दिल्लीत होणाऱ्या चर्चेवेळी वादग्रस्त ठरलेले तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची मागणी लावून धरण्याचा निर्धार त्या संघटनांनी केला आहे.
केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्या कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी पंजाबमधील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. त्या संघटनांनी रेल रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे रेल्वेने 24 सप्टेंबरपासून पंजाबमधील प्रवासी आणि माल वाहतूक स्थगित केली. रेल्वेची मालवाहतूक सुरू व्हावी यासाठी शेतकरी संघटनांनी रेल्वेमार्गावरील धरणे आंदोलन मागे घेतले. मात्र, सुरक्षेच्या वातावरणात प्रवासी आणि मालाची वाहतूक एकाच वेळी सुरू व्हावी, अशी भूमिका रेल्वेने घेतली आहे.
त्याशिवाय, कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याच्या भूमिकेवर केंद्र सरकार ठाम आहे. त्यातून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करण्याचे निमंत्रण शेतकरी संघटनांना देण्यात आले. ते निमंत्रण शेतकरी संघटनांनी स्वीकारले आहे. पंजाबमधील रेल्वेची माल वाहतूक सुरू करण्याची मागणीही त्या संघटना चर्चेवेळी करणार आहेत.