नवी दिल्ली – मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करून रोहित शर्माने स्वतःला सिद्ध केले आहे. आता विराट कोहलीच्या जागी रोहितकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे. आता जर हा निर्णय घेतला नाही तर ते दुर्दैव ठरेल, अशा परखड शब्दात माजी कसोटीपटू गौतम गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे.
आयपीएल स्पर्धेत मुंबई संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली जबरदस्त वर्चस्व राखले आहे. त्यानेच पाच वेळा संघाचे विजेतेपद साकार केले आहे. त्याने नेतृत्व करताना संघ भावनाही वाढीला लावली आहे. प्रत्येक केळाडूकडून त्याच्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करून घेतला आहे. हेच त्याचे गुण त्याला कोहलीपेक्षाही जास्त सरस कर्णधार ठरवण्यासाठी पुरेसे आहेत. आता भारतीय संघाचे कर्णधारपद रोहितकडे देण्यात आले नाही तर ते भारताचे दुर्दैव असेल, असेही गंभीर म्हणाला.
कोणताही खेळाडू पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकत असेल तर ती त्याची गुणवत्ता नव्हे का? एक कर्णधार तेवढाच चांगला असतो जेवढा त्याचा संघ सरस असतो यात दुमत नाही. एका कर्णधाराचे यश मोजण्याचे माप म्हणजे त्याने संघाला किती यश मिळवून दिले त्याचा आढावा घेणे. महेंद्रसिंग धोनीला
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असे का म्हणतात तर त्याने दोन विश्वकरंडक स्पर्धा संघाला जिंकून दिल्या. मग रोहितनेही पाच वेळा आयपीएल जिंकून दिली आहे. रोहितला जर भारतीय संघाचे कर्णधारपद व टी-20 संघाचे कर्णधारपद मिळाले नाही तर संघाचेच नुकसान होणार आहे, असेही गंभीरने
सांगितले.