नवी दिल्ली/मुंबई – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या अर्जावर न्या. डी. वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर उद्या सकाळी सुनावणी होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून अर्णब गोस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात “कॅव्हेट’ दाखल करण्यात आले आहे.
अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला आहे. तुरुंगात असलेल्या अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी होत आहे. मात्र पोलिसांकडून ही परवानगी नाकरण्यात आली. अशातच आता राज्य सरकारने कॅव्हेट दाखल केल्याने अर्णब यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्याचप्रमाणे नाईक कुटुंबीयांनीही मध्यस्थ याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात नाईक कुटुंबीय मुळ तक्रारदार असल्याने त्यांचीही बाजू कोर्टाने ऐकून घ्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गोस्वामी यांना अलिबागमधील कोरोना सेंटर असलेल्या एका शाळेमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. त्यानंतर 4 दिवसांनी त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.