राजगुरूनगर (पुणे) – शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीसह शेतीपूरक व्यवसायासाठी पुढे आले पाहिजे. दर्जेदार शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठेत थेट उतरले पाहिजे. दर्जेदार पिकांचे व बियाणांचे वाण जोपासताना सेंद्रिय खताचा वापर करुन यांत्रिकीकरणावर भर दिला पाहिजे. कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनाचा लाभ घेताना शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती उत्पादनाचा बाजारपेठेचा अंदाज बांधून दर्जेदार उत्पादन घेतले पाहिजे, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले.
चासकमान धरणांतर्गत येणाऱ्या दरकवाडी (ता. खेड) येथील 535 शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने स्वयंचलित यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन सुरू केलेल्या भीमाशंकर प्रोड्युसर संस्थेला आयुक्त धीरजकुमार यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातील अशा प्रकारची शेतकऱ्यांनी उभारलेली पहिलीच कंपनी असून ती उभी करणाऱ्या शेतकऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली.
शेतकरी सभासदांना केंद्र आणि राज्य शासनामार्फत जास्तीत मदत करण्याची यावेळी आश्वासन देऊन धीरजकुमार यांनी मार्गदर्शन केले. आयुक्त धीरजकुमार यांनी खेड तालुक्यातील वाडा आणि राजगुरूनगर मंडळातील रब्बी हंगामातील राष्ट्रीय सुरक्षा योजनेतील भात, हरभरा प्रकल्पाला भेट देऊन पहाणी करुन मार्गदर्शन केले. कडधे येथील शंकरराव देवदरे यांच्या द्राक्ष बागेला तसेच कृष्णमूर्ती फांऊडेशनच्या सह्याद्री स्कूलला भेट देत आढावा घेतला. दरकवाडी येथे शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने ग्रामबीज उत्पादन अंतर्गत पायाभूत बियाणाचे मुलभूत बियाणे कार्यक्रम राबविला आहे.
यावेळी पिकविमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, पिकेल ते विकेल योजना, नाविन्यपूर्ण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आदि कृषीविषयक शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनाचा आयुक्त धीरजकुमार यांनी आढावा घेतला.
यावेळी विस्तार योजनेचे माजी संचालक शिसोदे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, शेतकरी कंपनीचे अध्यक्ष रामदास लांडगे, रंगनाथ पाचंगे, विष्णु गुंडाळ, नामदेव काळे, मंगेश पाचंगे, नंदू वाणी, नंदा लगड, कृष्णा लांडगे, मंडलाधिकारी रामचंद्र बारवे आदिंसह संचालक, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक कंपनीचे अध्यक्ष रामदास लांडगे यांनी केले, संयोजन संचालक विष्णू गुंडाळ यांनी केले तर रंगनाथ पाचंगे यांनी आभार मानले.