सातारा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले नसून मराठी माणसाच्या हितासाठी उठाव केला आहे. त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर सर्वानी मुख्यमंत्र्यांना खंबीरपणे साथ द्यायला हवी. आमच्या कोयना, सोळशी, कांदाटी खोऱ्याचा मुख्यमंत्री झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान असून एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी 105 गावांतील जनता खंबीरपणे उभी राहणार आहे. या विभागातील सुपुत्र म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला आणि विचारांना आमचा एकमुखी पाठिंबा आणि समर्थन असल्याचा निर्णय सर्वपक्षीय कोयना, सोळशी, कांदाटी गाव समाज बैठकीत एकमताने घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या आहिर येथे कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील ग्रामस्थांचा मेळावा झाला. या मेळाव्याला ना. शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, भाऊ नगरसेवक प्रकाश शिंदे, महेश शिंदे, महाबळेश्वर तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष धोंडीबाशेठ धनावडे, मार्डचे संचालक विठ्ठलशेठ धनावडे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेलार, विभागप्रमुख लक्ष्मण कदम, उपविभाग प्रमुख शंकर कदम, उपतालुकाप्रमुख बबन सकपाळ, युवा सेनेचे राम सकपाळ, “मधुसागर’चे संचालक राजेश उतेकर,
बाजार समितीचे संचालक संजय मोरे, 43 गाव समाज अध्यक्ष कोंडिबा शिंदे, 22 गाव समाज अध्यक्ष आनंद नलावडे, जावळी बॅंकेचे माजी सचालक बजरंग संकपाळ, चंद्रकांत सकपाळ, हरिभाऊ सकपाळ, गंगाराम सकपाळ आदी उपस्थित होते. प्रकाश शिंदे म्हणाले, “शिंदे यांनी ही भूमिका का घेतली याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. शिवसेना संपवण्याचे कटकारस्थान सुरू होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या संस्कारात वाढलेल्या शिंदे यांना ते योग्य वाटले नाही. शिवसेना वाचवण्यासाठी त्यांना उठाव करावा लागला. मराठी माणसाने ना. शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन केले पाहिजे.’
धोंडिबाशेठ धनावडे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या विचारांचे या भागात आता आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य या निवडणुकीत आपल्याला निवडून आणायचे आहेत. त्यासाठी कोयना, सोळशी, कांदाटी विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भागात पर्यटन व्यवसाय व विकासकामे मार्गी लावण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी एकमुखाने एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.’
यावेळी गंगाराम सकपाळ, हरिभाऊ सकपाळ, माजी सरपंच भाऊ मोरे, दीपक जाधव, बाजीराव संकपाळ, विठ्ठल शिंदे, विजय नायडू, धोंडू शेलार, शिवाजी कदम, आनंद नलावडे, प्रकाश संकपाळ, कोंडीबा शिंदे, बजरंग संकपाळ, संजय मोरे, महेश शिंदे, चंद्रकांत सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दिला. मेळाव्याचे नियोजन धोंडिबाशेठ धनावडे, संजय शेलार व चंद्रकांत सकपाळ यांनी केले. सूत्रसंचालन सरपंच बबन संकपाळ यांनी केले.