तिसऱ्या तिमाहीतील विक्रीवर परिणाम
पुणे – जानेवारी ते सप्टेंबर या काळात पुण्यासह देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये घर विक्रीत समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या काळात पाऊस आणि इतर कारणांमुळे विक्रीत फारशी वाढ होऊ शकली नाही.
पुण्यासह मोठ्या 7 शहरांतील विक्रीच्या आकडेवारीचे संकलन करून “ऍनारॉक’ या संस्थेने या संबंधातील एक अभ्यास अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार या 9 महिन्यांमध्ये पुण्याने विक्रीत इतर शहरांच्या तुलनेत बाजी मारली आहे. पुण्यातील घर विक्री 32 टक्क्यांनी वाढून 17,530 कोटी रुपयांची झाली आहे. गेल्या वर्षी मूल्यामध्ये या 9 महिन्यांत पुण्यातील घर विक्री 13,2,75 कोटी रुपयांची झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, 9 महिन्यांमध्ये 7 शहरांत घरांची विक्री 16 टक्क्यांनी वाढली आहे. मूल्यांमध्ये ही विक्री 1.54 लाख कोटी रुपयांची भरते. तर एककामध्ये या 9 महिन्यांमध्ये 2.02 लाख युनिटस विकले गेले. गेल्यावर्षी या 9 महिन्यांमध्ये 1.78 लाख युनिट विकले गेले होते. अभ्यास अहवालातील माहितीनुसार, मुंबईतील घर विक्रीत 30 टक्क्यांनी, बंगळुरु शहरातील विक्री 7 टक्क्यांनी, दिल्लीतील विक्री 5 टक्क्यांनी झाली आहे.
तिमाहीत विक्री 17 टक्क्यांनी कमी
तिसऱ्या तिमाहीत विक्री वाढली नसल्याचे स्पष्टीकरण करताना या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी म्हटले आहे की, तिसऱ्या तिमाहीत पितृपंधरवाडा येतो. या कालखंडात लोक खरेदी टाळतात. या तिमाहीत सबव्हेंन्शन योजनेवर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर बऱ्याच शहरात पाऊस चालल्यामुळेही तिसऱ्या तिमाहीत घर विक्रीवर परिणाम झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत घर विक्री 17 टक्क्यांनी कमी झाली असल्याचे पुरी यांनी सांगितले.