राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासांत 89 व्यक्तीचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्याची रुग्णांची संख्या 1460 झाली आहे. यामध्ये आज चाकणमध्ये दोन तर आळंदीत एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात मृतांची संख्या 28 झाली असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात गेल्या तीन दिवसांत 250 पेक्षा जास्त व्यक्ती करोनाबाधित सापडल्या आहेत.
चाकणमधील एका कंपनीत 120 कामगार करोना पॉझिटिव्ह सापडले होते, त्यातील 70 व्यक्ती खेड तालुक्यातील आहेत. प्रशासनाने त्यांच्या शोध घेत त्यांना क्वारंटाइन करून संशयित व्यक्तींची करोना स्वॅब टेस्ट करण्यात येणार आहे. कंपनी कामगारांनी आणि व्यवस्थापनाने काळजी घ्यावी. हलगर्जी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
खेड तालुक्यात मागील 24 तासात चाकण 16, आळंदी 2, राजगुरूनगर 3 अशा तीन नगर परिषदांमिळून 21 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील येलवडी 13, खराबवाडी 12, खालूंब्रे 7, वाकी बुद्रुक 7, मेदनकरवाडी 6, म्हाळुंगे 4, गोलेगाव 4, कडाचीवाडी 2, आंबेठाण 2, वडगाव घेनंद 2, नाणेकरवाडी 1, राक्षेवाडी 1, सांगुर्डी 1, निघोजे 1, शिंदे 1, चिंचोशी 1, वाफगाव 1, होलेवाडी 1, रानमळा 1 अशा 19 गावात एकूण 68 व्यक्ती कारोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
ऑगस्टअखेर रुग्णसंख्या तीन हजारांवर?
खेड तालुक्यात करोनाने कहर केला आहे दिवसेंदिवस बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. चाकण एमआयडीसीमध्ये खाजगी कंपन्या करोनाचे केंद्र बनल्या आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधील कामगाराना झाली आहे. यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील करोना बाधित व्यक्तींची संख्या वाढत असून ती ऑगस्टअखेर 3 हजारांच्यावर जाण्याचा अंदाड प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने तालुक्यात उपाययोजना सुरु झाल्या आहेत.