नवी दिल्ली – सीआरपीएफ आणि बीएसएफसह देशातल्या सहा निमलष्करी दलांमध्ये 84,600 हून अधिक पदे रिक्त आहेत, तर गेल्या तीन वर्षांत या दलांमध्ये 1.12 लाख पदे भरण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत सांगितली. राय म्हणाले की कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार, निमलष्करी दलातील 10 टक्के रिक्त जागा माजी सैनिकांसाठी थेट भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत.
या पदांच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के रिक्त जागा राखून ठेवण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ते म्हणाले की सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत या दलांमधील विद्यमान रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. राय म्हणाले की 2022 मध्ये आत्तापर्यंत निमलष्करी दलातील 10,377 पदे भरण्यात आली आहेत, 2021 मध्ये 69,551 पदे आणि 2020 मध्ये 32,400 पदे भरण्यात आली आहेत.