डिपॉझिटही घेण्यात येणार ः यवतला ग्रामसभेत ठराव मंजूर
यवत- येथील ग्रामपंचायत मालकीचे असलेल्या 82 गाळ्यांच्या भाड्यामध्ये वाढ करून त्यांच्याकडून डिपॉझिट घेणार आहे. बुधवारी (दि. 14) यवत (ता. दौंड) येथील काळभैरवनाथ मंदिरात सरपंच रझिया तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या महसुलात वाढ होणार आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने एक महिन्यापूर्वी संबंधित गाळेधारकांना करार करण्यासंदर्भात नोटिसा दिल्या होत्या. गाळेधारकांचे यापूर्वीचे करार नसल्याने एक महिन्याच्या आत करार करून घ्यावेत, असे आजच्या ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला. शासकीय जागेत झालेले अतिक्रमण शासकीय नियमानुसार पूर्तता करून नियमित करण्याबाबत ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानुसार अतिक्रमण नियमित करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
उमेश दिवेकर यांनी यवत (ता. दौंड) येथील एसटी बस स्थानकावर स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची आणि नागरिकांची कुचंबणा व गैरसोय होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार महामार्गाच्या दोन्ही बाजूला स्वच्छतागृह उभारण्याचे ग्रामपंचायतीने मान्य करून त्याबाबचा ठराव मंजूर केला. ग्रामपंचायतीच्या उत्पादनाचापैकी 3 लाख 28 हजार 688 रुपयांचा निधी अपंग कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे. महिला व बालके यांच्या उन्नतीसाठी 2 लाख 55 हजार 535 रुपयांचा निधी आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी 9 लाख 86 हजार 64 रुपयांच्या निधी वापराला ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. यावेळी सरपंच रझिया तांबोळी, उपसरपंच भाऊसाहेब दोरगे, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य कुंडलिक खुटवड, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
- दरमहा 500 ते 1100 रुपये भाडे
सुभाषअण्णा कुल गाळे संकुल आणि त्यापुढील गाळे अशा 21 गाळेधारकांकडून 1 लाख रुपये डिपॉझिट व 1100 रुपये मासिक भाडे घेण्यात येणार आहे, तर धान्य बाजार आणि लगतचे गाळेधारक, तसेच जिल्हा परिषद शाळेमागील बाजूस असलेल्या 14 गाळेधारक अशा एकूण 61 गाळे धारकांकडून 50 हजार रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये दरमहा भाडे घेतले जाणार आहे. - पोटभाड्याने दिलेले गाळे ताब्यात घेणार
ग्रामपंचायत प्रशासनाच्या असे लक्षात आले की, बरेच गाळेधारक स्वतः गाळा न वापरता तो पोट भाडेकरूला गाळा भाड्याने देत आहे. असे गाळे ग्रामपंचायत ताब्यात घेणार असून, त्या गाळ्यांचा जाहीर लिलाव करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व महामार्गाच्या विस्तारीकरणात ज्यांचे गाळे गेले आहेत अशांना प्रथम प्राधान्य देऊन गाळे देणार असल्याचा ग्रामसभेत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.