पुणे – नीलेश घायवळ टोळी सदस्य आणि जांभळी गावचा माजी उपसरपंच पप्पू ऊर्फ गोरक्ष गोपीनाथ तावरे (वय 35) याच्या खून प्रकरणातील गजा मारणे टोळीतील आठ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. त्यापैकी तीन जण आठ वर्षांपासून तुरूंगात होते. सत्र न्यायाधीश नांदेडकर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात एकुण तेरा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यापैकी फिर्यादी असलेल्या मयताच्या पत्नीसह सात जण फितुर झाले.
ज्ञानेश्वर तावरे, निखिल पोटघन, अनिल भगत, प्रविण ऊर्फ पप्पू पासलकर, रुपेश तावरे, रामदास पवार, आकाश शिंदे आणि अक्षय जोरी अशी त्या आठ जणांची नावे आहेत. या प्रकरणात आणखी दोघांवर गुन्हा दाखल असून, ते अद्याप मिळून आलेले नाहीत.
बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा, ॲड. जितेंद्र सावंत, ॲड. राहुल भरेकर, ॲड. अनिकेत येवले, ॲड. संग्राम काटे आणि ॲड. वैभव मेदणकर यांनी काम पाहिले. 8 डिसेंबर 2013 रोजी हवेली तालुक्यातील जांभळी गावच्या हद्दीत ही घटना घडली.
तावरे हा जांभळी गाव आणि परिसरात आरोपींना दहशत पसरविण्यात आणि खंडणी उकळण्यास विरोध करत होता. हे कारण आणि पूर्ववैमनस्यातून काठी, कोयत्याने मारहाण करून, गोळ्या घालून खून केल्याचा आरोप सर्वांवर होता. या प्रकरणात आठ वर्षानंतर आठ जणांची मुक्तता झाली आहे.