नवी दिल्ली – शेतकरी नेते हरविंदर सिंग लखवाल यांनी सांगितले आहे की, कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. हे आंदोलन चिघळत चालले आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी 8 डिसेंबरला भारत बंदची देण्यात आली आहे. आंदोलनाला मोठे स्वरुप देण्यासाठी दिल्लीतील रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मीटिंगनंतर ही माहिती दिली.
सरकारसोबत शनिवार दि. 6 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीपूर्वी शेतकरी नेत्यांनी भारत बंदची हाक दिल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारवर चर्चेपूर्वी दबाव वाढवण्यासाठी ही बंदची हाक तर दिलेली नाही ना, असाही सूर काही जण आळवत आहेत.
पुरस्कार वापसी सुरुच
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुरस्कार परत देण्याचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारी लेखक डॉ. मोहनजीत, चिंतक डॉ. जसविंदर आणि पत्रकार स्वराजबीर यांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले आहेत. गुरुवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी आपला पद्मविभूषण अवॉर्ड परत केला होता. त्यांच्यासोबतच, राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंग ढींढसा यांनीदेखील आपला पद्मभूषण परत करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिल्लीच्या सीमेवरुन हटवण्याचे निर्देश द्यावे. अर्जदाराचे वकील ओम प्रकाश परिहार याबाबत माहिती दिली. परंतु, या अर्जावरील सुनावणीचा दिवस अद्याप ठरलेला नाही.