जुन्नर, ता. 26 – उद्या सायंकाळी येथील शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्र जन्मोत्सवानिमित्त बालशिवाजी व जिजामाता यांच्या पुतळ्यांचे अनावरण मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. या समारंभासाठी दक्षिण महाराष्ट्र व नाशिक वगैरे भागातून सुमारे दीड ते दोन लाख लोक येतील असा अंदाज आहे.
उद्याच्या कार्यक्रमासाठी शिवनेरीच्या पायथ्याशी भव्य शामियाना उभारण्यात आला असून त्यात एक लाख लोक बसू शकतील. ना. यशवंतराव चव्हाण यांचे व्याख्यान उद्या याच शामियानात होणार असून त्यावेळी ते महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याची औपचारिक घोषणा करतील. बंदोबस्तासाठी 1230 पोलीस व 60 अधिकारी मागविण्यात आले आहेत. त्याखेरीज हजार बाराशे स्वयंसेवक व स्वयंसेविकाही येथे हजर आहेत. मुंबई राज्याचे बांधकाममंत्री बाळासाहेब देसाई हे समारंभाची जातीने व्यवस्था पाहात आहेत.
भारत-चीन तंटा सौदेबाजीने मिटणार नाही
नवी दिल्ली – भारत-चीनच्या पंतप्रधानांचे जे पत्रक काल प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यावरून उभय देशांचे भारत-चीन सीमावाद मिटविण्यासंबंधात मतैक्य झाले नाही हे स्पष्ट झाले आहे, असे पंतप्रधान पं. नेहरू यांनी सांगितले. चाऊ एन लाय यांना निरोप देण्यासाठी पंडितजी विमानतळावर आले असता त्यांनी पत्रकारांना मुलाखत दिली. चाऊंशी झालेल्या वाटाघाटीसंबंधी ते बोलत होते.
पंडितजी म्हणाले, मूलभूत तंगी कायमची असली तरी सध्याची तंगीची तीव्रता कमी होण्यास मात्र या वाटाघाटीचा उपयोग झाला. भारत-चीन वाद शांततामय मार्गांनी मिटविण्यासंबंधी आपण आशावादी आहात का असे विचारता ते म्हणाले, शांततामय मार्गाने तडजोड साधणे नेहमीच चांगले. आम्ही प्रयत्न करू. यश मिळणारच नाही असे धरून चालणार नाही. पंडितजी पुढे म्हणाले, विशिष्ट प्रश्नांत मतैक्य झाले नसले तरी इतःपर अतिक्रमण होणार नाही अशी आशा निर्माण झाली आहे.