भोपाळ (मध्य प्रदेश) – मध्यप्रदेशातील भाजपचे सरकार हे 50 टक्के कमिशनचे सरकार असल्याचा आरोप सध्या सुरू आहे. कंत्राटदारांच्याच एका संघटनेने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींना सादर केलेल्या निवेदनात हा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी या संबंधात वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारे आरोप केल्यानंतर भाजपने त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांनीही प्रियंका गांधींवर कारवाईचा इशारा दिला आहे. कंत्राटदार संघटनेचे पत्र बनावट असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यावर कॉंग्रेसनेहीं जोरदार पलटवार केला आहे. कर्नाटकातील सरकार चाळीस टक्के कमिशन सरकार असल्याचा मुद्दा बराच गाजला होता व त्याचा फटका भाजपला बसला होता. त्याचीच पुनरावृत्ती मध्यप्रदेशात होऊ नये यासाठी भाजपही आक्रमक बनत आहे.
प्रियंका यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर, मध्य प्रदेशातील कॉंग्रेस नेते अरुण यादव यांनी रविवारी आरोप केला की मध्यप्रदेशातील भाजपचे सरकार हे भ्रष्टाचाराचे माहेर घर बनले आहे आणि 50 टक्के कमिशन घेणारे सरकार इथे काम करत आहे.दरम्यान प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील राज्य सरकारवर ‘भ्रष्टाचार’ केल्याचा आरोप करणाऱ्या पोस्टवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
50% कमिशनचा उल्लेख असलेले बनावट पत्र व्हायरल करण्यात आल्याची तक्रार ज्ञानेंद्र अवस्थी नावाच्या व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आली होती. काही सोशल मीडिया हॅंडलने हे पत्र व्हायरल केले आहे. याप्रकरणी ज्ञानेंद्र अवस्थी यांच्यासह कॉंग्रेस नेते प्रियंका गांधी, कमलनाथ आणि अरुण यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देवसकर यांनी रविवारी दिली.
मध्य प्रदेश हे भ्रष्टाचाराचे होमग्राउंड बनले आहे आणि राज्यात 50 टक्के कमिशनचे सरकार कार्यरत आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवला आणि दोन दिवसांपूर्वी आम्ही आणि आमच्या ठेकेदार मित्रांनी ही बाब उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निदर्शनास एका पत्राद्वारे आणली, असे अरुण यादव यांनी सांगितले. त्यांनी माझ्या, प्रियंका गांधी वढेरा आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आम्ही मध्य प्रदेशातील या भ्रष्ट सरकारविरुद्ध लढत राहू असा निर्धार यादव यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याविरुद्धच्या एफआयआरवर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेसच्या नेत्या शोभा ओझा म्हणाल्या, “राज्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सर्वांनाच माहिती आहे, त्यांना एफआयआर करू द्या, आम्ही याविरोधात लढू. राज्यातील जनता भ्रष्टाचाऱ्यांना राज्यातून हाकलून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कॉंग्रेस नेते पीसी शर्मा म्हणाले की, राज्यात सरकारी कामांत 50% कमिशन घेतले जात आहे हे खरे आहे, जर तुम्ही खरे बोलाल, तर भाजप सरकारमध्ये तुमच्यावर एफआयआर नोंदवला जाईल, परंतु आम्ही घाबरणार नाही.
“मध्य प्रदेशातील कंत्राटदारांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून राज्यात 50 टक्के कमिशन दिल्यावरच बिलांचे पैसे मिळतात, अशी तक्रार केली आहे. कर्नाटकातील भ्रष्ट भाजप सरकार 40 टक्के कमिशन घेते. मध्य प्रदेशात भाजपने स्वतःचेच भ्रष्टाचाराचे विक्रम मोडीत काढले.कर्नाटकच्या जनतेने 40 टक्के कमिशन देऊन सरकार उलथून टाकले, आता मध्य प्रदेशातील जनता 50 टक्के कमिशन देऊन भाजप सरकारला सत्तेवरून हटवणार आहे. असे प्रियंकांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.