ठाणे – ठाणे शहरातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. रूग्णालच्या डीनला या प्रकरणी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याची सुचना करण्यात आली आहे असे आरोग्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,या मृत्यूंच्या प्रकरणांचे विश्लेषण केले जात आहे. डॉक्टरांकडून तसेच कर्मचाऱ्यांकडून या विषयी माहिती घेतली जात आहे. रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे, की यातील अनेक रूग्ण आधीपासूनच गंभीर अवस्थेत होते तर काही रूग्ण वृद्ध होते. काहीं अधिकाऱ्यांनी 17 नव्हे तर 18 रूग्ण दगावल्याचे म्हटले आहे.
पीटीआयशी बोलताना पोलिस उपायुक्त गणेश गावडे म्हणाले, आमच्याकडे गेल्या 24 तासांत 17 मृत्यू झाल्याची माहिती आहे. आम्हाला दररोज सहा ते सात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.” रुग्णालय व्यवस्थापनाने आम्हाला सांगितले की काही रुग्ण गंभीर अवस्थेत तेथे पोहोचले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही वृद्ध होते. या मोठ्या संख्येने झालेल्या मृत्यूमुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आम्ही रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे,असेही त्यांनी नमूद केले.
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की डीनच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल. हे रुग्णालय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागांतर्गत येते. त्याचे मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात पोहोचले आहेत आणि ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत,असे सावंत म्हणाले.