गुवाहाटी – आसाममध्ये सत्तेवर आल्यास महिलांना सरकारी नोकऱ्यांत 50 टक्के आरक्षण उपलब्ध करण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. ते पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्मिता देव यांची येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास आसाममध्ये महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणावर भर देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे त्या राज्यातील महिला आणि तरूण मतदारांना आपल्याकडे खेचण्याची रणनीती कॉंग्रेसने आखल्याचे सूचित झाले.
आसाममध्ये एकूण 2.31 कोटी मतदार आहेत. त्यामध्ये महिला मतदारांचे प्रमाण जवळपास निम्मे म्हणजे 1.14 कोटी इतके आहे. आसाममध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. विविध पक्षांशी हातमिळवणी करून कॉंग्रेसने महाआघाडी स्थापन केली आहे. त्या महाआघाडीला सत्तारूढ भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत. आसाममध्ये काही महिन्यांपूर्वी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात तीव्र आंदोलन झाले. त्यामुळे सीएएवरून भाजपला घेरण्याची रणनीतीही कॉंग्रेसची असल्याचे समजते.