नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मा यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देणार असल्याची घोषणा योगी सरकारने केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी पाच जवान शहीद झाले याबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले की, त्यांचा पराक्रम कधीच विसरला जाणार नाही. त्यांच्या या शौर्याला प्रणाम. आमच्या सद्भावना सदैव त्यांच्या परिवारासोबत आहेत.
या संदर्भातील माहिती देताना अपर मुख्य सचिव गृह अविनाश कुमार अवस्थी म्हणाले की, शहीद कर्नल आशुतोष शर्मा उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खानापूर गावात राहत होते. त्यांच्या मृत्यूने मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपये आणि परिवारात एका सदस्यास सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच बुलांदशहर जिल्ह्यात दारात त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार बनवून त्यांना गौरव करण्यात येणार आहे.
कर्नल शर्मा हे 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना काश्मीरमध्ये दोन वेळा वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हंडवारा परिसरात झालेल्या हल्ल्यात कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह अजून पाच जवान शहीद झाले आहेत.
कर्नल आशुतोष यांच्या अनेक मोहिमा यशस्वी
या चकमकीत हौतात्म्य प्राप्त झालेले कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांनी यापूर्वी दहशतवाद्यांविरोधातील अनेक कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र, या कारवाईत त्यांना हौतात्म्य आले. जम्मू-काश्मीरमध्ये पाच वर्षानंतर झालेल्या दहशतवादी चकमकीत सैन्याने कमांडिंग ऑफिसर गमावला आहे. यापूर्वी 2015 मध्ये कुपवाडाच्या हाजीनाका जंगलात दहशतवादी चकमकीत, महाराष्ट्राचे सुपुत्र, 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते.
दहशतवादी कमांडरचा खात्मा
चकमकीत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा मुख्य कमांडर हैदरला कंठस्नान घातले. हैदर हा पाकिस्तानचा रहिवासी होता. तो लष्कर-ए-तोयबाचा काश्मीरचा कमांडर-इन-चीफ होता. याशिवाय अन्य दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे.
“टीआरएफ’ने स्वीकारली जबाबदारी
लष्कर-ए-तोयबाच्या “द रेजिस्टेस फ्रंट’ने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लष्कर-ए-तोयबाच्या द रेजिस्टन्स फ्रंटचा प्रयत्न आहे. वर्चस्वाच्या या लढाईतूनच टीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला.
शौर्य वाया जाणार नाही : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील या चकमकीबद्दल शोक व्यक्त केला आहे. हंदवाडा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या शौर्यास मी अभिवादन करतो. त्यांचे शौर्य आणि त्याग देश विसरु शकत नाही. मी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही हंदवाडातील चकमक अतिशय दु:खद आहे. दहशतवाद्यांशी लढा देताना त्यांनी निर्भय धैर्य दाखवून देशासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचा त्याग आणि शौर्य देशाला आठवेल, असे स्पष्ट केले.