समाजद्रोह्यांना दया नाही चव्हाणांची जाहीर शपथ
वर्धा, दि. 22 – साठेबाज, नफेबाज आणि भ्रष्टाचारी यांना कोणतीही दयामाया दाखविली जाणार नाही, अशी जाहीर शपथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी येथे घेतली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, धान्याची साठेबाजी करणारांविरुद्ध सरकार कडक कारवाई करील. त्यांच्या बाजूने कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांनी रदबदली करू नये.
पुण्यात आदिवासी पोलीस येणार?
पुणे – पुणे शहरात यापुढे आदिवासी समाजातील पोलीस येण्याची शक्यता वाढली आहे. कारण आदिवासी समाजातील तरुणांची पोलीस खात्यामार्फत भरती चालू झाली आहे. पुण्याचा कोटा पूर्ण करण्यासाठी धुळे, ठाणे येथील आदिवासी तरुणांना पुण्यात भरती केले जाईल. आदिवासी समाजाला हा न्याय उशिरा का होईना मिळत असल्याबद्दल आदिवासी नेत्यांनी समाधान व्यक्त केले व म्हटले, आमच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन व कसोटी लावली तर समाजात असलेला अडाणीपणा जाईल.
देशातील हिंसाचारामागे विदेश शक्तींचा हात
नवी दिल्ली – भारतात उफाळलेल्या हिंसाचारामागे काही विदेशी शक्तीचा हात असल्याचा इशारा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या वार्षिक परिषदेसमोर बोलताना दिला. श्रीमती गांधी पुढे म्हणाल्या, या परिस्थितीला कल्पकतेने तोंड
दिले पाहिजे.
नागालॅंडमध्ये राष्ट्रपती राजवट
नवी दिल्ली – नागालॅंडवर राष्ट्रपतींची राजवट लावण्यात आली असून नागालॅंड असेंब्ली स्थगित ठेवण्यात आली आहे. राष्ट्रपतींची राजवट लावण्याचा हुकूम राष्ट्रपतींनी आज सकाळी जाहीर केला.
हॉकी विश्व चषकावर जम्मू-काश्मीर भाग अलग
नवी दिल्ली – हॉकी विश्व चषकावरील नकाशात भारताच्या भूमीचा काही भाग पाकिस्तानात दाखविल्याबद्दल भारताने जोरदार निषेध व विरोध नोंदविला. त्यामुळे किरकोळ बदल करून हा चषक बदलावा लागला.