राज्यात संयुक्त सरकारचा कॉंग्रेस पक्षाचा विचार नाही
मुंबई, दि. 22 – आगामी विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाचा संयुक्त सरकारचा विचार नाही, असे नरेंद्र तिडके म्हणाले. इंदिरा गांधींना महाराष्ट्र भेटीचे आमंत्रण यापूर्वीच देण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी व निवडणुकीत प्रचारासाठी त्यांना बोलाविण्यात येईल.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष भाई डांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाले आहे. वनातवाला यांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम लीग गट, फॉरवर्ड ब्लॉक तसेच इतर “जनता’ विरोधी पक्षांशी बोलणी केली जातील. फक्त निवडणूक समझोत्यासाठी ही बोलणी होतील. संयुक्त सरकारचा कॉंग्रेस पक्षाचा विचार नाही.
व्यक्तीपूजा नको!
अस्सा बृट्टर (फरिदकोट), दि. 22 – आपण व्यक्तीपूजेविरुद्ध असल्याचे पंतप्रधान मोरारजी देसाई येथे बोलताना म्हणाले. येथे जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, व्यक्तीपूजेमुळे देशाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. माझ्याकडे कोणतीच शक्ती नाही. मी तुमच्याकडूनच शक्ती मिळवितो.
सुखी नसलेले बालपण हे लेखक घडविते
पुणे – सुखी नसलेले बालपण हे लेखक होण्यास कारण घडते, असे उद्गार प्रसिद्ध ग्रामीण लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी काढले. साहित्यिक वयाच्या विसाव्यापर्यंत मिळालेल्या अनुभवावरच साहित्य निर्माण करू शकतो. माझे विसाव्या वर्षांपर्यंतचे आयुष्य माडगूळसारख्या निसर्गरम्य खेड्यात गेले. त्यामुळे माझ्या साहित्यात ग्रामीण गोष्टींना महत्त्व असते.