– प्रा. विजय कोष्टी
वनस्पतीशास्त्राचे एक जागतिक ख्यातीचे संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस (बसू) यांची आज 23 नोव्हेंबरला पुण्यतिथी, तर 30 नोव्हेंबरला जन्मदिन, दोन्ही एकाच आठवड्यात येतात. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा…
प्राणीमात्राप्रमाणेच वनस्पतीदेखील सजीव आहेत, वनस्पती हालचाली करतात, त्यांची वाढ होते, त्यांना भावना देखील असतात हे सर्वप्रथम शास्त्रीय दृष्टीने मांडणारे जगदीश चंद्र बोस हे भारतीय शास्त्रज्ञ होत. वनस्पतीमध्येसुद्धा आनंद, भय, राग, लोभ इत्यादी भावना दिसतात, हे प्रयोगातून सर्वप्रथम जगाला त्यांनी सांगितले. विज्ञानात क्रांतिकारक शोध लावणाऱ्या या शास्त्रज्ञाचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी फाळणीपूर्व बांगलादेशमधील ढाका जिल्ह्यातील विक्रमपूर या शहरात झाला. बंगालच्या भूमीने स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर असे अनेक सुपुत्र दिले आहेत अशा सुपुत्रांपैकी डॉ. बोस हे एक होते. त्यांचे घराणे सुविद्य होते. वडील डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. परकियांचे अनुकरण न करता स्वदेश सेवा करावी ही शिकवण त्यांना वडिलांकडून बालपणीच मिळाली. लहानपणापासून त्यांना निसर्गाची आवड होती. घरा भोवताली बाग करून त्यामध्ये त्यांनी तलाव तयार केला होता व त्यामध्ये मासे, तर तलाव परिसरात ससे, साप पाळले होते.
अशा प्रकारे निसर्गाच्या निरीक्षणाला तेव्हापासूनच सुरुवात झाली. जगदीशचंद्र यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोलकत्त्यात झाले. वयाच्या बाविसाव्या वर्षी ते पदवीधर झाले. त्यानंतर 1880 साली ते लंडन विद्यापीठाची वैद्यकशास्त्राची पदवी घेण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. तथापि, त्यांचे त्यात मन न रमल्याने त्यांनी वर्षभरात वैद्यकशास्त्राचा नाद सोडला व ते केंब्रिज विद्यापीठात पदार्थविज्ञान रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांच्या अभ्यास करण्यास गेले. या विषयातील त्यांचे ज्ञान पाहून तेथील प्रोफेसर रेले प्रभावित झाले. 1884 मध्ये यांनी केंब्रिज विद्यापीठाची बी.ए. व 1885 साली लंडन विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते भारतात परत आले आणि कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये पदार्थविज्ञान या विषयाचे अध्यापन करू लागले. या कॉलेजमधील इतर प्राध्यापक युरोपियन असल्याने प्रारंभी त्यांना वांशिक छळ सोसावा लागला. परंतु त्यांची बुद्धिमत्ता व संशोधनाचे महत्त्व लक्षात येताच त्या युरोपियन प्राध्यापकांनाही त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. याच कॉलेजमध्ये त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत काम केले.
डॉ. बोस यांनी 1895 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये विद्युत चुंबकीय तरंगाचे ध्रुवीकरण अर्थात स्फटिकामुळे प्रकाशाला विशिष्ट स्थितीत प्राप्त होणारी दिक प्राप्ती (झेश्ररीळूरींळेप) यावर संशोधन करून लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळविली. याच वेळी त्यांचा “विद्युतीय वक्रीभवनाचे मोजमाप’ हा निबंध लंडनच्या रॉयल सोसायटीने प्रसिद्ध केला. विद्युत चुंबकीय लहरी (रेडिओ लहरी) वर मेक्वेल व हर्टझ या शास्त्रज्ञांनी संशोधन केले होते. डॉ. बोस यांनी यावर संशोधन सुरू केले. त्यांनी तयार केलेल्या उपकरणांच्या सहाय्याने त्यांनी रेडिओ लहरी तयार केल्या व त्या लहरींच्या साहाय्याने त्यांनी दूर अंतरावरील घंटा वाजवण्याचे व वजन सरकविण्याचे प्रयोग केले. मात्र बोस यांनी हे संशोधन पुढे चालू ठेवले नाही. पुढे इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला. बोस यांनी प्राणी व वनस्पती यांच्या क्रियांमधील साम्य या प्राणीशास्त्रातील विषयावर संशोधन केले. वनस्पतींना प्राण्यांप्रमाणेच भावना व संवेदना असतात हे त्यांनी प्रयोगाने सिद्ध केले.
यासाठी त्यांनी स्वयंलेखक व प्रतिक्रिया लेखक अशी यंत्रे शोधून काढली. प्रतिक्रिया लेखकाच्या सहाय्याने बोस यांनी सिद्ध केले की; लाजाळूच्या झाडास बाह्य प्रेरणा लावली, तर ते एका सेकंदात उत्तर देते तर पुन्हा त्यास पूर्वस्थितीत येण्यास बारा मिनिटे लागतात. प्रकाश, आवाज, स्पर्श व वीज यांना वनस्पती प्रतिसाद देतात. वनस्पती व प्राणी या दोहोंमधील चेतासंस्थात निश्चित स्पष्ट अशी सीमारेषा दाखविता येणार नाही. विष, जीवनसत्त्वे व अल्कोहोल यांचा जसा मानवांवर परिणाम होतो तसा वनस्पतीवरही होतो. (वनस्पतींना क्लोरोफॉर्म हुंगवला, मर्क्युरिक क्लोराइड हे विष पाजले, अतिउष्ण तापमानात ठेवले. वनस्पतींनी जो प्रतिसाद दिला, तो प्राण्यांनी त्या-त्या वेळी दिलेल्या प्रतिसादाशी जुळणारा होता) वनस्पतींची अतिसूक्ष्म होणारी वाढ मोजण्यासाठी त्यांनी क्रेस्कोग्राफ नावाचे यंत्र शोधून काढले. त्यांनी तयार केलेल्या “डेथ रेकॉर्डर’ या उपकरणाच्या सहाय्याने साठ अंश सेल्सिअस तापमानाला वनस्पती मरतात व मृत्यूवेळी त्या विजेचा मोठा दाब तयार करतात, हे दाखविले.
बोस यांच्या शोधामुळे शास्त्रीय जगात त्यांचा व त्यांच्यामुळे भारताचा मोठा नावलौकिक झाला. युरोप, अमेरिकेतील अनेक विद्यापीठात त्यांनी त्यांच्या शोधावर व्याख्याने दिली. 1900 मध्ये पॅरिस येथे भरलेल्या जागतिक वैज्ञानिक परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 1916 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना “नाइट’ ही पदवी बहाल केली. 1920 मध्ये रॉयल सोसायटीने त्यांना बहुमानाने “फेलो’ म्हणून नियुक्त केले. 1927 मध्ये डॉ. बोस भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष झाले. तसेच त्यांना व्हिएन्ना येथील अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सन्माननीय सभासदत्व मिळाले. 1926 ते 1930 या काळात ते यूनोच्या बौद्धिक सहकार्य समितीचे सभासद होते. प्रसिद्ध फ्रेंच लेखक रोमा रोला यांनी त्यांना “नव विश्वाचा द्रष्टा’ असे म्हणून गौरविले, तर बर्नार्ड शॉ यांनी त्यांना “जीवशास्त्रातील ज्ञानराजा’ ही पदवी दिली. यूनोच्या कचेरीत डॉ. जगदिशचंद्रांचा पुतळा उभा करावयास हवा, असे उद्गार सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांनी काढले होते. 23 नोव्हेंबर 1937 रोजी त्यांचे निधन झाले.