नवी दिल्ली – देशातील अभुतपूर्व कोळसा टंचाईविषयी सार्वत्रिक ओरड सुरू झाल्यानंतर आता केंद्र सरकारने रेल्वे मालगाड्यांमार्फत कोळसा वीज केंद्रांपर्यंत पोहचवण्यासाठी लगबग सुरू केली आहे.
त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 42 पॅसेंजर गाड्या रद्द करून मालवाहतुकीला प्राधान्य दिले आहे. रद्द करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्यापैकी 34 गाड्या साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेच्या आहेत, 8 गाड्या नॉर्दन रेल्वेच्या आहेत तर बाकीच्या अन्य ठिकाणच्या आहेत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील खासदारांनी विरोध केल्यानंतर रद्द करण्यात आलेल्या 3 पॅसेंजर गाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
पॅसेंजर गाड्या रद्द केल्यानंतर त्यांच्या जागी मालगाड्यांच्या वाहतुकीला प्राधान्य देऊन त्याद्वारे इप्सित ठिकाणी कोळसा वाहतूक जलदगतीने करणे शक्य होणार आहे. अनेक वीज केंद्रे कोळशा अभावी एक-दोन दिवसांत बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने केंद्र सरकारकडून या वेगवान हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.