कार्ला – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर भूस्खलनात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानिमित्ताने मावळ तालुक्यातील भाजे गावात 1989 साली झालेल्या भुस्खलन दुर्घटनेची आठवण ताजी झाली. 23 जुलै 1989 या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास डोंगरावरील दगड व माती भाजे गावावर काळ बनून आले व तब्बल 39 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
या घटनेचे प्रत्यक्षादर्शी असलेले 68 वर्षांचे गोपाळ बारमुख यांनी भाजेच्या घटनेची आठवण सांगत, आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पाणावलेल्या डोळ्यांनी, दु:खाचा आंवठा गिळत ते म्हणाले, आख्खा मातीचा ढिगारा यामध्ये मोठ्या दगडांसह खाली सरकला या खराळात माझ्या घराची भिंत पडली. माझ्या दोन मुली अडकल्या. सुदैवाने कपाटावर दगड अडकल्याने त्या वाचल्या. आजही तो क्षण आठवला तर डोळ्यातून अश्रू येतात. आजही अशा प्रकारच्या बातम्या पाहिल्या तर डोळे पाणवताता. अशा बातम्या पाहूशी वाटत नाहीत.
यामध्ये घारे, राऊत, खाटपे, टकले यांच्यासह अनेक परिवरातील कुणाची आई, कुणाचे वडिल, कुणाचा भाऊ, बहिण तसेच जिवा भावाची माणसे गमवावी लागली त्या आठवणीने डोळ्यांत अश्रू येतात. या घटनेची माहिती देताना बारमुख म्हणाले आदल्या दिवशी मुसळधार पाऊस असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. आमच्या घराकडे पाण्याचा मोठा प्रवाह येत असल्याने पाणी कोठून येत आहे हे पाहण्यासाठी मी आणि माझा भाऊ वर बघायला गेलो. यावेळी आम्हाला डोंगराला भेगा पडलेल्या दिसल्या खाली घराकडे येण्याअगोदर क्षणातच होत्याचे नव्हते झाले .आख्खा मातीचा ढिगारा यामध्ये मोठ्या दगडांसह खाली सरकला या खराळात माझ्या घराची भिंत पडली
त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर मदन बाफना हे महसूलमंत्री होते. घटनेची माहिती समजताच सर्व यंत्रणा गावात दाखल झाली. स्वतः शरद पवार भाजे गावात आले होते. त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे गावातील 113 जणांचे पुनर्वसन त्याच वर्षी रस्त्याच्या खालील बाजूला करण्यात आले. भाजे गावातील प्रतिष्ठित स्थानिकांनी गावातच जागा उपलब्ध करुन दिल्याने पुनर्वसन भाजे गावातच करण्यात आले.व यामुळे गावातील लोक गावातच राहू शकले.
आता बाजे पर्यटनासाठी प्रसिद्ध
आज हेच भाजे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध असून भाजे धबधबा, लोहगड किल्ला, भाजे लेणी, विसापूर किल्ला पाहण्यासाठी व वर्षाविहाराचा आनंद घेण्याची हजारो पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. आता पर्यटकांचे गाव भाजे गाव म्हणून ओळख बनू लागली आहे.