पिंपरी -गेल्या पाच महिन्यांपासून वल्लभनगर आगारातील संपावर असलेले कर्मचारी कामावर हजर होऊ लागले आहेत. बुधवार (दि. 20) पर्यंत 150 कर्मचारी कामावर हजर झाले.
त्यामुळे आगारातील 50 पैकी 30 बस सुरू झाल्या आहेत. तर बडतर्फ केलेले 26 कर्मचारी अद्याप रुजू होण्यासाठी प्रतिक्षेत आहेत. वल्लभनगर आगारातील सुमारे 180 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यापैकी 150 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामध्ये 58 चालक, 52 वाहक व वर्कशॉपमधील 40 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. तर बडतर्फ केलेले 26 कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाही.
त्यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे रुजू करून घेण्यासाठी अपील केले आहे. अपील केल्याच्या तारखेपासून तीन आठवड्यामध्ये कामावर रुजू करून घ्यावे असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार या कर्मचाऱ्यांना तीन आठवड्यात रूजू करून घेतले जाणार आहे. मात्र 22 एप्रिलपर्यंतच याबाबत निकाल देऊन महामंडळाने रुजू करून घ्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. वल्लभनगर आगारातून 30 बस सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर, उमरगा, गाणगापूर, दापोली, महाड, लातूर, नाशिक, हैदराबाद, पंढरपूर, तूळजापूर आदी बसचा समावेश आहे. सर्व कर्मचारी रुजू झाल्यानंतर उर्वरित 20 बस देखील सुरू करण्यात येणार आहे.
वल्लभनगर आगारातील 26 कर्मचारी बडतर्फ केले होते. त्यांना अद्याप रूजू करून घेण्यात आले नाही. अपील केल्यानंतर तीन आठवड्यात बडतर्फ कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. मात्र आमच्या कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपूर्वीच रुजू करून घ्यावे.
– ओमप्रकाश गिरी, कर्मचारी.