रांची – वादग्रस्त टिप्पणीवरून राजधानी रांचीमध्ये झालेल्या निषेध मोर्च्यादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी हजारो लोकांच्याविरोधात 25 एफआयआर दाखल केल्या आहेत. या हिंसाचारानंतर खंडीत करण्यात आलेली इंटरनेट सेवा 33 तासांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे, असे रांची पोलीस उपायुक्त छावी रंजन यांनी सांगितले.
रांची शहरातील अतिसंवेदनसील बागांमध्ये बंदोबस्तासाठी 3,500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर जलद कृती दल, दहशतवादविरोधी पथक, विशेष टास्क फोर्स आणि जिल्हा पोलिसांचे कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत, असे रांचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र कुमार झा यांनी सांगितले. गस्त घालण्यासाठी 50 मोटर सायकल पथकेही तैनात केली गेली आहेत.
गुप्तचर, सीआयडी आणि सोशल मीडियाच्या इनपुटच्या आधारे चौकशी सुरू आहे, असे झा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर झालेल्या या हिंसाचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला होता. तर अन्य दोन डझन लोक घंभीर जखमी झाले होते. वादग्रस्त टिप्पणीबाबत भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपूर शर्मा आणि हकालपट्टी करण्यात आलेले प्रसिद्धी प्रमुख नवीन जिंदाल यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यासाठी काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागले होते.