पाटणा – आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय लालूप्रसाद यादव यांनी घेतला आहे. या निवडणुकीमध्ये बिहारी असला पाहिजे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. मात्र ही निवडणूक लढवणारे लालूप्रसाद यादव म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष नाहीत. हे लालू प्रसाद यादव बिहारमधील सरण जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बिहारच्या राजकारणातील बडे प्रस्थ असलेल्या लालू प्रसाद यादव यांचे आणि यांचे नाव सारखेच आहे. या दोघांचीही कर्मभूमी देखील बिहार हीच आहे.
राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी लालू प्रसाद यादवांनी दिल्लीचे विमानाचे तिकीट देखील निश्चित केले आहे. ते 15 जूनला दिल्लीला जाऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी 2017 मध्येही राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
तेंव्हा त्यांचा सामना बिहारचे तत्कालिन राज्यपाल रामनाथ कोविंद आणि लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्याशी झाला होता. तेंव्हा अर्थातच कोविंद यांचा विजय झाला आणि ते राष्ट्रपती झाले होते. तेंव्हा पुरेसे पाठबळ नसल्यामुळे लालूंचा अर्ज नामंजूर झाला होता. मात्र यावेळी त्यांनी अधिक चांगली तयारी केली आहे, असे यादव यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
लालू प्रसाद यादव अवघे 42 वर्षांचे असून सरण जिल्ह्यातील रहिमपूर गावातील रहिवासी आहेत. राजदच्या लालूंप्रमाणे त्यांचेही कुटुंब मोठे आहे. त्यांना 7 मुले आहेत. शेती हा प्रमुख उद्योग असलेल्या या लालूंना समाजसेवेची आवड आहे. स्वतःला भुमीपुत्र म्हणवणाऱ्या लालूंना केवळ आवड म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायची आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राबडीदेवींचा पराभव आपल्यामुळेच झाल्याचे राजदचे लालू म्हणतात, असे या लालूंनी अभिमानाने सांगितले. राजदचे लालू अपात्र ठरल्यामुळे राबडीदेवींनी 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्या भाजपच्या राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या, त्यावेळीही या लालूंनी निवडणूक लढवली होती. त्यांना केवळ 10 हजार मते पडली होती. त्यानंतर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. पंचायतीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत सर्व निवडणूका लढवण्याचा विक्रम त्यांना करायचा आहे.