नवी दिल्ली – सरलेल्या आठवड्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर टोमॅटोच्या दरात 13 टक्क्यांची घट झाली असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या संदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 21 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात टोमॅटोचे दर 13 टक्क्यानी कमी झाल्याचे निरीक्षण आहे.
त्याचबरोबर सरलेल्या पूर्ण महिन्यांमध्ये टोमॅटोचे दर 24 टक्क्यांनी कमी झाली असल्याचे ग्राहक व्यवहार विभागाचे म्हणणे आहे. 21 डिसेंबर रोजी टोमॅटोचे दर सर्व साधारणपणे 48 रुपये प्रति किलो होते. 14 डिसेंबर रोजी हेच दर 55 रुपये प्रति किलो होते असे या विभागाने सांगितले.
दर का कमी होत आहे याची कारणमीमांसा करताना पत्रकात म्हटले आहे की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या टोमॅटो उत्पादन करणाऱ्या मोठ्या राज्यातून आवक वाढली आहे. त्या अगोदर या राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाला होता. त्याचबरोबर वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते. आता परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे वेगाने टोमॅटोचे पीक मोठ्या शहराकडे येत आहे.
राजस्थान राज्यातूनही टोमॅटोची आवक वाढली असल्याचे निरीक्षण या विभागाने नोंदविले आहे. विविध राज्यात अवकाळी पाऊस गेल्या महिन्यामध्ये काही शहरांमध्ये टोमॅटोचे दर 100 रुपये ते 120 रुपये प्रति किलो या पातळीपर्यंत उसळले होते. मात्र आता परिस्थिती समाधानकारक आहे. आगामी काळातही टोमॅटोच्या पिकावर फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा या पत्रकात करण्यात आला आहे.