भारतीय कसोटी क्रिकेटसाठी 2021 हे वर्ष अविस्मरणीय होते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मायदेशासह परदेशातही रोमांचक विजय नोंदवले. भारताने घरच्या मैदानावर खेळताना प्रतिस्पर्ध्यांना मात दिलीच पण जागतिक क्रिकेटमध्ये कित्येक दशकांपासून वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला त्यांच्यात देशात धूळ चारण्याचा भीम पराक्रम केला.
एकंदरीत, 2021 मध्ये भारताने 14 कसोटी सामने खेळत त्यापैकी 8 सामने जिंकण्यात यश मिळाले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह 3 कसोटी भारताने गमावल्या. तर 3 सामने अनिर्णित राहिले. या पार्श्वभूमीवर भारताच्या 2021 मधील 3 सर्वोत्तम कसोटी विजयांवर एक नजर.
1. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा द गाबा येथे चौथी कसोटी
ब्रिस्बेनमधील द गाबा मैदानावर येथे बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा भारताने कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवलेल्या सर्वोत्तम विजयांपैकी एक म्हणून गणला जातो. 2021 मधील भारताचा हा सर्वोत्कृष्ट कसोटी विजय होता. विशेष म्हणजे भारताने हा समाना विराट कोहली, अश्विन, बुमराह, शमी आणि जडेजा यांच्या अनुपस्थितीत खेळला होता.
चौथ्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली होती. ऑस्ट्रेलियाने गेल्या 32 वर्षात द गाबा येथे एकही कसोटी सामना गमावला नव्हता. मात्र, भारतीय संघाने टिच्चून खेळ करत ऑसीजला 3 गडी राखून पराभूत करून मालिका 2-1 अशा फरकाने जिंकून इतिहास रचला.
2. भारताचा इंग्लंड दौरा, लॉर्ड्स दुसरी कसोटी
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकणे जगातिल कोणत्याही संघासाठी सोपे काम नाही. पण परदेशात कसोटी जिंकण्याची सवय लागलेल्या भारतीय संघासाठी ते अशक्य नव्हते. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 364 धावा केल्या होत्या.
रोहित शर्मा (145 चेंडूत 83 धावा) आणि केएल राहुल (250 चेंडूत 129) या जोडीने सलामी करताना 126 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला होता.
इंग्लंडनेही 391 धावा करत जोरदार प्रत्युत्तर दिले. जो रूटने 321 चेंडूत 180 धावांची खेळी केली. पुढे भारताच्या दुसर्या डावात इंग्लंडने 209 धावांत 8 फलंदाज तंबूत पाठवले होते. मात्र, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यातील नाबाद 89 धावांच्या भागीदारीमुळे भारताला इंग्लंडसमोर 298 धावांचे आव्हान उभे करता आले.
यामध्ये शमीने 70 चेंडूंत नाबाद 56 धावा केल्या, तर बुमराहने 64 चेंडूंत 34 धावांचे योगदान दिले. या भागीदारीमुळे भारताला सामना जिंकण्याची संधी मिळाली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला गुंडाळण्यासाठी भारताकडे फक्त 60 षटके होती. भारतीय वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडची भंबेरी उडवत 8 षटके शिल्लक असताना इंग्लंडला केवळ 120 धावांत गुंडाळले.
3. भारताचा इंग्लंड दौरा, केनिंग्टन ओव्हल, चौथी कसोटी
केनिंग्टन ओव्हल मैदानावरील इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके झळकावली पण इतर फलंदाज अपयशी ठरले. यामध्ये भारताचा पहिला डावात अवघ्या 191 धावांत आटोपला. फलंदाजांचे अपयश मागे सोडत भारतीय गोलंदाजांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नामुळे इंग्लंडला त्यांच्या पहिल्या डावात 290 धावांत गुंडाळले.
दुसर्या डावात चांगली धावसंख्या उभारण्यासाठी भारताला मजबूत सुरुवातीची गरज होती. रोहित शर्मा आणि केएल राहुलने आणखी एक मौल्यवान अशी 82 धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रोहित शर्माने 256 चेंडूत 127 धावांची अप्रतिम खेळी केली.
विराट कोहली (44), पुजारा (61), पंत (50), ठाकूर (60) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि भारताने 466 धावा केल्या. इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 210 धावांत आटोपला. भारताने हा सामना 157 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.