पाथर्डी – श्री वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने 2022-2023 हंगामामध्ये 4 लाख 5 हजार 167 मे. टन ऊस गाळप करून 4 लाख 20 हजार 900 क्विंटल साखर उत्पादन केले. हंगामाचा सरासरी साखर उतारा 10.71 टक्के प्राप्त झाला असून एफआरपी दर रुपये 2 हजार 499.80 प्रती मे.टन येत आहे. यापैकी रुपये 2 हजार 300 प्रती मे.टन प्रमाणे प्रथम उचल यापुर्वीच अदा केली असून उर्वरीत रक्कम रुपये 199.80 हा दर राऊंडअप करुन रुपये 200 रुपये प्रती मे. टन प्रमाणे ऊस दराची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी दिली.
भारत सरकारच्या धोरणात्मक निर्णयाप्रमाणे कारखान्याने हंगाम 2022-2023 मध्ये गाळपास आलेल्या ऊसास प्रति मे.टन. रुपये 2 हजार 500 प्रमाणे कोणत्याही प्रकारची कपात न करता खरीप हंगामाच्या प्रयोजनासाठी वेळेवर उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. कारखान्याने अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचल सुरु असून इथेनॉल प्रकल्पाची उभारणी पूर्ण होवून चाचणी उत्पादनास सुरूवात देखील झाली आहे. तसेच कारखान्याचे संचालक मंडळाने आडसाली ऊस लागवडीसाठी बिनव्याजी अर्थसहाय्य योजना जाहीर केलेली असून जास्तीत जास्त ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देणेत येत आहे.
2023-24 हंगामासाठी सुमारे 5.50 लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले असून कारखाना कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्राची गळीतासाठी नोंद झालेली आहे. संपूर्ण ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकी विभागामार्फत आवश्यक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेची भरती चालू आहे. कारखान्याचा आगामी गळीत हंगाम वेळेवर सुरू करणेसाठी मशिनरी दुरूस्ती व देखभाल इ. आवश्यक कामकाज प्रगतीपथावर असलेबाबत संचालक राहुल राजळे यांनी सांगितले.