नगर – जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण विकास आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यास मूर्त स्वरुप देऊन जिल्ह्याचा औद्योगिक, पर्यटन विकास, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य शासनाने देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयामध्ये पीकविमा राबविण्याचा निर्णय घेतला. गतवर्षामध्ये केवळ 2 लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये भाग घेतला होता. परंतू यावर्षी जिल्ह्यातील 11 लक्ष शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवुन आपले पीक संरक्षित केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर नल योजना राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातुन या योजनेसाठी जिल्ह्यात 4 हजार कोटी रुपयांच्या निधीद्वारे पाणीपुरवठ्याची कामे केली जात असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जिल्ह्यात रोजगार निर्मितीवर अधिक प्रमाणात भर देण्यात येत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबीराच्या माध्यमातुन 5 हजार 989 युवकांना करिअर संधीचा तर तीन रोजगार मेळाव्याद्वारे 1 हजार 130 युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्याच्या विकास आराखड्यात रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून,यासाठी लोकांच्या सहभागाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक अंबादास सुखदेव हुलगे, पोलीस निरीक्षक दिनेश विठ्ठल आहेर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अनुकंपा नियुक्ती धोरणांतर्गत उमेदवारांना नियुक्तीपत्र, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा व कृषी विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन राहुरीच्या नायब तहसिलदार संध्या दळवी यांनी केले.