ओंकार दळवी
जामखेड – जामखेड मतदारसंघातील पाटेगाव – खंडाळा येथील प्रास्तावित असलेल्या एमआयडीसीचा मुद्दा सध्या विधानसभा व विधानपरिषदेत चांगला गाजत आहे.आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला. मात्र दोन्ही आमदारांकडून श्रेयवादासाठी होत असलेल्या आरोप- प्रत्यारोपांच्या कचाट्यात कर्जत- जामखेड एमआयडीसी अडकणार तर नाही ना असा प्रश्न? कर्जत-जामखेडच्या जनतेला पडला आहे.
अंतिम टप्प्यात यश येत असतानाच राजकीय श्रेयवाद रंगला आणि एमआयडीसी रखडली जाणार का?ज्या मतदारसंघाच्या जोरावर राजकारण करायचं आणि त्यांचीच अशा पद्धतीने जणू थट्टा सुरू झाली आहे. दोन्ही तालुक्यातील युवकांना तालुक्याबाहेर किंवा थेट जिल्ह्याबाहेर नोकरीला जाणे, असेच पर्याय या भागातील युवकांपुढे आहेत.
कर्जत-जामखेड हा भाग आवर्षण प्रवण क्षेत्रात येतो.पाऊस कमी आणि बेभरवशाचा. त्यामुळे शेतीही धोक्यात असते. दुसरा कोणताही व्यवसाय, उद्योग या भागात नाही. त्यामुळे स्थलांतर वाढले आहे.पुणे जिल्ह्यातील रांजणगाव, दौंड, शिरूर, बारामती तसेच अहमदनगर, सुपा, वाळुंज यासह इतर औद्योगिक वसाहतींमध्ये जामखेड- कर्जतमधील युवक लक्षणीय आहे. नोकरीसाठी आपला तालुका सोडून त्यांना दूरच्या ठिकाणी जावे लागते. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे.
ज्या युवकांच्या जोरावर राजकारण करायचे, त्यांचीही अशी चेष्ठा सुरू आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.राम शिंदे व आ.रोहित पवार यांच्या पाठपुरवठ्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. एमआयडीसीबाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. आ. रोहित पवार यांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली व अंतिम मंजुरी मिळावी,यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला.विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून केवळ मंजुरीचे आश्वासन मिळत असल्याने व ठोस निर्णय होत नसल्याने अखेर आ. रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात आंदोलन केले.
यानंतर विधानपरिषदेमध्ये आ. राम शिंदे यांनी ही जमीन नीरव मोदी यांच्यासह अनेक बाहेरील व्यक्तीची असल्याचा आरोप केला, नेमका उद्योगपतीसाठी की युवकांसाठी एमआयडीसी स्थापन करण्याची असा प्रश्न उपस्थित करून बॉम्ब फोडला. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तीन महिन्यात चौकशी करू, असे आश्वासन दिल्याने एमआयडीसी रखडली जाणार हे मात्र निश्चित आहे.
कर्जत तालुक्यातील पाटेगाव, खंडाळा येथे ही एमआयडीसी होणार आहे. हे ठिकाण कर्जत आणि जामखेड तालुक्यांच्या मध्यवर्ती आहे. या जागेची पाहणी यासंबंधीच्या समितीने दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी केली. पाटेगाव व खंडाळा येथील 458.72 हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसीचे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, पुढे हे काम रखडले. यामागे श्रेयवादाचे राजकारण आहे, असा पवार यांचा आरोप आहे.त्यामुळे यावरून पुन्हा राजकारण पेटले आहे. केवळ एमआयडीसीच नाही तर जामखेड तालुक्यातील पोलिसांच्या राखीव बटालिनच्या उभारणीतही असा अनुभव. नेत्यांचा श्रेयवाद रंगत असताना युवकांचे मात्र फरफट होत आहे.
मुळात एमआयडीसी ही रात्रीतून उभी राहणारा गोष्ट नाही. त्यासाठीची पूर्तता करून तेथे उद्योग आणणे, ते सुरू होणे, चांगले चालणे याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत नोकरीच्या अपेक्षेने वाट पाहणाऱ्या युवकांना हाल सहन करावे लागत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती सीमेवर असलेल्या पाटेगाव-खंडाळा या ठिकाणी नियोजित एमआयडीसी प्रस्तावित असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिकबाबी यापूर्वीच पूर्ण झालेल्या आहेत. फक्त अधिसूचना काढणे बाकी असतानाही सरकार बदलल्याने श्रेयवादातून परवानगी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
दोन्ही आमदारांची प्रति’ष्ठा’पणाला
एमआयडीसीसाठी आ. रोहित पवार यांनी पाठपुरावा केला तसेच अंतिम मंजुरीसाठी विधाभवनात आंदोलनही केले. परंतु आपणच एमआयडीसी आणणार असा छातीठोक दावा आ.राम शिंदे करीत आहेत. एमआयडीसीचे श्रेय आपल्यालाच मिळावे, यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावल्याची जिल्हाभरात चर्चा आहे.