नवी दिल्ली – हवाई दलामध्ये अग्निवीर योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या नियुक्तीसाठी तब्बल 2 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अग्निवीरांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्या केवळ 6 दिवसांतच हे अर्ज प्राप्त झाले आहेत, असे संरक्षण मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.
भरतीची प्रक्रिया 24 जून रोजी सुरू झाली. सोमवारी 94,281 अर्ज दाखल करण्यात आले होते. तर रविवारी 56,960 अर्ज दाखल झाले होते. अग्निवीर योजना 14 जून रोजी जाहीर झाल्यानंतर काही राज्यांमध्ये या योजनेच्याविरोधात हिंसक निदर्शने झाली होती. ही निदर्शने आठवडाभर सुरू राहिली होती.
काही राजकीय पक्षांनीही ही योजना मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र, या योजनेतून भरती होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे, असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भारत भूषण बाबू यांनी टिट्वरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हवाई दलासाठी अग्निवीर योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 5 जुलै ही अंतिम मुदत आहे.