मुंबई – आम्हीसुद्धा शिवसेनेसाठी खूप काही केलेले आहे. आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाहीत, असा टोला शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी लगावला. गुवाहाटीतील ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये इतर आमदारांना संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, 1992 दंगली वेळी आम्ही तिघे भाऊ आणि आमचे वडील कारागृहात होतो. त्यावेळेस संजय राऊत कुठे होते मला माहीत नाही. 302 काय असते हे संजय राऊतांना माहीत नाही, आम्ही सगळ्यांनी ते भोगलेले आहे. तडीपार काय असतं हे त्यांना माहीत नाही, दंगलीच्या वेळी पायी चालणं काय असतं हे त्यांना माहीत नाही. हे लोक फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडले, आपल्या 52 आमदारांना सोडले, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. आपण बाळासाहेबांचे विचारांनी प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत. 80 टक्के जरी संघटनेचा असला तरी 20 टक्के स्वतःच्या सहभाग आहे.
संजय राऊतांनी 47 डिग्री सेल्सियसमध्ये जळगावात येऊन 35 लग्न लावून दाखवावीत मी त्यांना 72 म्हणून समजून घेईन. रात्री 12 वाजताही आमचा मोबाईल सुरू असतो. आपण 39 आणि अपक्ष 11 ते 12 मंडळी सभागृहात आणि डिबेटमध्ये काफी आहोत, असेही ते म्हणाले.