औरंगाबाद – बुलढाणा जिल्ह्यातील 19 गावच्या सरपंचांनी के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’मध्ये प्रवेश केला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी “बीआरएस’मध्ये प्रवेश केला, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सांगितले. हे 19 सरपंच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित आहेत.
या 19 सरपंचांमध्ये 12 जण कॉंग्रेसचे, 6 जण राष्ट्रवादीचे आणि एक जण प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा आहे. या सरपंचांचा कार्यकाळ 18 महिन्यांनंतर समाप्त होणार आहे. मात्र त्यापूर्वीच हे सरपंच “बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत.
विद्यमान संरपंचांबरोबर 2 शिवसेनेचे आणि एक शेतकरी संघटनेच्या अशा एकूण 3 माजी सरपंचांनीही “बीआरएस’मध्ये प्रवेश केला असल्याचे “बीआरएस’च्या महाराष्ट्र किसान सेलचे प्रमुख माणिक कदम यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये “बीआरएएस’ मध्ये आतापर्यंत 14 लाख कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आहे. यापुढील काळामध्ये अधिक कार्यकर्त्यांना आकर्षित करून घेण्यासाठी नोंदणी अभियान सुरू केले जाणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.