नवी दिल्ली :- जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद आणि माजी प्रदेशाध्यक्ष पीरजादा मोहम्मद सईद यांच्यासह डेमोक्रॅटिक आझाद पक्षाच्या सतरा नेत्यांनी (17 leaders of Ghulam Nabi Azad’s party return to Congress) गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाची साथ सोडून पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एआयसीसीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी नेत्यांचे स्वागत केले.
ते म्हणाले की, हा पक्षासाठी आनंदाचा दिवस आहे कारण भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरात प्रवेश करण्याच्या आधी हे नेते कॉंग्रेस मध्ये परतले आहेत. भारत जोडो यात्रा ही देशातील एक मोठी चळवळ बनली आहे आणि त्यामुळेच या सर्व नेत्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
गुलामनबी आझाद यांना या यात्रेचे निमंत्रण देण्यात आले आहे का, यावर वेणुगोपाल म्हणाले की, कॉंग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्यांचे भारत जोडो यात्रेत स्वागत आहे. आम्ही सर्व समविचारी पक्षांना यात्रेत सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा सईद या यात्रेत सामील होतील आणि श्रीनगरमध्ये राहुल गांधींसोबत फिरतील.
Pune : भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी
दरम्यान, ताराचंद यांना कॉंग्रेस सोडण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की, “आम्ही भावना आणि मैत्रीच्या आहारी गेलो आणि घाईघाईने पक्ष सोडला. आमचा हा निर्णय चुकीचा होता. त्याचा आम्हाला पश्चाताप होतो आहे. त्यामुळे आम्ही कॉग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे ताराचंद यांनी सांगितले.