578 कोटी 85 लाख 41 हजार कोटी खर्च
पुणे – देशभरात नोव्हेंबर 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत महाराष्ट्रात 14 लाख 70 हजार 416 लाभार्थ्यांना एकूण 578 कोटी 85 लाख 41 हजार कोटींचा निधी वितरित केला आहे. या कार्याची दखल घेत, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत आयोजित मातृवंदना सप्ताहाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित केले.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा, बाळाची निगा घेता यावी यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेकरिता केंद्राकडून 60 टक्के तर, राज्याकडून 40 टक्के निधी पुरविण्यात येतो.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत 2 ते 8 डिसेंबर 2019 दरम्यान देशभर मातृवंदना सप्ताहाचे आयोजन केले होते. याची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना यावेळी मोठे व छोटे राज्य अशा दोन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात येते. मोठ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकाविला असून पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे आणि सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लाभार्थ्यांना या सप्ताहात समाविष्ट करून घेण्यासाठी प्रसार माध्यमे, सोशल मीडिया, आशा वर्कर व अंगणवाडीसेविकांमार्फत जनजागृती करण्यात आली. सप्ताहादरम्यान रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, गर्भवती मातांना पौष्टिक आहाराबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले होते. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत नव्या लाभार्थ्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी शिबिर आयोजित केली. काही कारणाने लाभार्थी सुटून गेले असल्यास त्यांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी घरोघरी भेट देण्याबरोबरच दूरचित्रवाणी वाहिन्या, नभोवाणीहून जिंगल्स व रेडिओ स्पॉटच्या माध्यमातून तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम या सप्ताहादरम्यान राबविण्यात आले.
देशभर मातृवंदना सप्ताहादरम्यान राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची संपूर्ण माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वेबपोर्टलवर अपलोड केली आहे. या माहितीचे परीक्षण करून आणि प्रत्यक्ष पाहणी करून अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची निवड केली. निवड झालेल्या मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.