ऐझॉल – बांगलादेशातून मिझारोमच्या हद्दीत बेकायदेशीररित्या घुसलेल्या बारा रोहिंग्य मुस्लिमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात आठ महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. रविवारी त्यांना एका घरातून ताब्यात घेण्यात आले. आपल्याला पळवून येथे आणण्यात आले आहे असे या पकडण्यात आलेल्या लोकांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे काही मोबाईल फोन सापडले आहेत पण त्यात सीमकार्डे नाहीत असेही पोलिसांनी सांगितले. हे लोक नेमके कसे भारतीय हद्दीत घुसले आणि त्यांना येथे कोणी आणले याचा शोध घेतला जात आहे.
म्यानमार मधून लाखो रोहिंग्यांना घालवून देण्यात आल्यानंतर त्यांनी सध्या बांगलादेशात आश्रय घेतला आहे. त्यांच्यापैकी अनेक जण सातत्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत असतात. यातील बहुतांशी लोक मिझोराम मार्गे भारतात शिरण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाबही उघड झाली आहे. त्यामुळे मिझोराम मध्ये पोलिसांनी विशेष दक्षता बाळगली आहे.