सातारा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. सातारा जिल्ह्याचा निकाल 96.72 टक्के लागला असून विभागात जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला आहे. विभागात कोल्हापूरचा पहिला क्रमांक आला असून सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या असून 97.88 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात 733 माध्यमिक शाळा असून मार्चमध्ये 116 केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली. 733 माध्यमिक शाळांमधील 37 हजार 930 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 37 हजार 811 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. शुक्रवारी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला
यामध्ये 36 हजार 574 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
19 हजार 924 मुलांनी ही परीक्षा दिली होती त्यापैकी 19 हजार 65 मुले उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी 95.68 टक्के आहे. 17 हजार 887 मुलींनी परीक्षा दिली होती त्यापैकी 17 हजार 509 मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची टक्केवारी 97.88 आहे. मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी 563 पुन: प्रविष्ठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 544 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 345 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी 63.41 टक्के आहे, अशी माहिती प्रभावती कोळेकर यांनी दिली.
वाई तालुक्याचा सर्वाधिक 98.09 टक्के निकाल
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा गतवर्षीपेक्षा दोन टक्के निकाल घटला आहे. जावळी तालुका 97.67 टक्के, कराड तालुका 97.04 टक्के, खंडाळा तालुका 97.08 टक्के, खटाव तालुका 96.47 टक्के, कोरेगाव तालुका 97.12 टक्के, माण तालुका 97.08 टक्के, महाबळेश्वर तालुका 97.57 टक्के, फलटण तालुका 94.70 टक्के, पाटण तालुका 96.07 टक्के, सातारा तालुका 96.82 टक्के, वाई तालुका 98.09 टक्के असा तालुकानिहाय निकाल लागला आहे. जिल्ह्यात वाई तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे.
===============