नवी दिल्ली: गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 2,350 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 39,174 इतकी झाली आहे. म्हणजेच, सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के इतका आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारतो आहे.
देशात सध्या कोविड-19 चे 58,802 सक्रिय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरू आहेत. या एकूण रुग्णांपैकी सुमारे 2.9% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात मृत्यूसंख्या 0.2 इतकी आहे. तर जगभरातल्या लोकसंख्येचा विचार करता, प्रति लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 4.1 मृत्यू इतके आहे.
देशभरात काल विक्रमी 1,08,2 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण 24,25,742 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
भारतात जानेवारी महिन्यात कोविड-19 ची चाचणी केवळ एकाच प्रयोगशाळेत होत होती. मात्र आपण अत्यंत जलद गतीने आपल्या चाचणी क्षमतेत वाढ केली असून सध्या देशात 385 सरकारी तर 158 खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांची सुविधा आहे. सर्व केंद्रीय सरकारी प्रयोगशाळा, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी क्षेत्रे या सर्व ठिकाणची चाचणी क्षमता वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय, चाचण्यांना गती देण्यासाठी आणखी दोन चाचणी किट्स विकसित करण्यात आल्या आहेत.
एम्ससारख्या 14 अग्रणी वैद्यकीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील प्रयोगशाळांना पुरेशी जैव-सुरक्षा प्रमाणके आणि अधिस्वीकृती करण्यात मदत करण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमध्ये चाचणीची साधने सतत उपलब्ध राहावीत यासाठी साहित्याचे वाटप करण्याच्या दृष्टीने, भारतीय टपाल आणि खासगी संस्थांच्या मदतीने 15 डेपो विकसित करण्यात आले आहेत. आधी चाचण्यांची साधने आपण आयात करत होतो, आता मात्र अनेक भारतीय कंपन्यांना ही साधने बनविण्यासाठी पाठबळ दिले जात आहे, यामुळे चाचणीची पुरेशी साधने देशात उपलब्ध आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 च्या चाचण्यांसाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आधीच्या निकषांसोबतच, आता चाचणीचे धोरण अधिक व्यापक करण्यात आले असून त्यात प्रतिबंधन आणि प्रभाव कमी करण्याच्या कामात सहभागी असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. रुग्णालयात भरती असलेल्या सर्व रुग्णांपैकी किंवा खङख ची लक्षणे असलेल्या कोणालाही, तसेच, घरी परत गेलेल्या स्थलांतरीत मजुरांना आजारपणानंतर सात दिवसात खङख ची लक्षणे आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.