वीस लाख लोकांचे स्थलांतर, परिस्थिती भयावह होण्याची भीती
नवी दिल्ली – या शतकातील सर्वात भयावह ठरेल असे अनुमान असणारे बंगालच्या उपसागरातील अम्फान चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर उद्या (बुधवारी) धडकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागातील स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील किनारावर्ती भागातील सुमारे वीस लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 24 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारच्या संपर्कात असून लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे वादळ सध्या ओडिशाच्या किनारपट्टीपासून 520 तर पश्चिम बंगाल किनारपट्टीपासून 670 सागरी मैल अंतरावर आहे. हे वादळ दर तासी चौदा किलोमीटर वेगाने पुढे येत आहे. तर त्याचा चक्रावाताचा वेग तब्बल 240 किलोमीटर प्रति तास आहे. किनारपट्टीच्या जवळ ते येईल त्यावेळी त्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे हे वादळ संहारक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
ओडिशामध्ये या वादळाचा धोका सर्वाधिक असल्याने तेथे 11 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. या सर्व नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. या वादळापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये आत्तापर्यत तीन लाख नागरिकांना स्थलांतरित केले असून त्यांच्या शेल्टरशेडमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. दोन्ही राज्यातील प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती घेतली. दोन्ही राज्यांना केंद्राकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय दोन्ही राज्याच्यावतीने आपत्ती प्रतिसाद दलाचे चार हजाराहून अधिक जवान तैनात करण्यात आले. दरम्यान आसाम मध्येही या वादळाचा फटका बसण्याची शक्यात लक्षात त्या राज्याने सतर्कतेचा आदेश दिला असून तेथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.