कोयनानगर | पाटण तालुक्यात तीन वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झालेल्या भूसल्खनामध्ये मोठी जीवित व वित्तहानी झाली होती. या दरडग्रस्तांना येत्या दीड वर्षांत कायमस्वरूपी घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी 70 कोटी रूपये निधी दिला असून त्यासंदर्भातील सर्वेक्षणाची सुरवात उद्यापासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बाधित दरडग्रस्त गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी शिद्रुकवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन आज झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी याशिनी नागराजन, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव आदी प्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात घरी कोंडल्या गेलेल्या विकासाला दीड वर्षांपूर्वी कॉमन मॅनचे सरकार आल्यामुळे गतीमान विकास सुरु झाला. एमएमआरडीए मुंबईत विकास कामांना निधी देते. राज्यात पहिल्यांदाच एमएमआरडीए पाटण तालुक्यातील 8 गावांच्या पुनर्वसनासाठी विशेष बाब म्हणून निधी देत आहे. सामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार लोकांसाठी काम करणारे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार प्रकल्प राबविल्यामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा 10 टीएमसीने वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेना- भाजप सरकारने लोकांच्या हिताचे प्रकल्प साकारले. दिलेला शब्द पूर्ण करणारे शिंदे सरकार आहे याची प्रचिती पाटण तालुक्यातील आठ दरडग्रस्त गावांतील लोकांचे प्रश्न सोडवल्यामुळे आली आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडविणारे हे सरकार असून शेतकऱ्यांच्या सुखदुःखात समरस होणा-या या सरकारने चालू केलेल्या शासन आपल्या दारी या अभियानात जिल्ह्य़ात 54 लाख लोकांना फायदा झाला आहे.
पाटण तालुका समृद्ध करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी 70 कोटी निधी दिला आहे. त्यामुळे पर्यटनक्षेत्रात पाटण तालुक्याचा लौकीक वाढणार आहे. तालुक्यात विकासाचा बँकलॉग भरून काढून तालुका समृध्द करण्यावर आपला भर असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.