अतुल देशमुख : खेड तालुक्यातील मुंबईस्थित नागरिकांना आवाहन
मुंबई- पश्चिम भागातील युवकांना घडवायचे आहे, त्यासाठी विधानसभेत आवाज उठवायचा आहे, हीच वेळ आली आहे “अभी नही तो कभी नही’ यासाठी तुम्ही “साक्षीदार नव्हे, तर साथीदार व्हा’. “आपल्या गावाचा’, “आपल्या भागाचा’, आपल्या मागासलेल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, प्रश्न मार्गी लावायचे आहेत. म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे, असे प्रतिपादन खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी सातबंगला, अंधेरी (मुंबई) येथे खेड तालुक्यातील मुंबईस्थित नागरिकां समोर केले.
रोजगारासाठी मुंबईस्थित असलेल्या व मतदान खेड तालुक्यात असलेल्या मतदार व नागरिकांना मार्गदर्शन करताना देशमुख अंधेरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील, कॉंग्रेसचे नेते अमोल पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कैलास गाळव, गिरजू चांभारे, काळुराम पिंजण, काळूराम आतकर, रघुनाथ लांडगे, सुनील भालचिम, रमेश मुलाणी, संजय रौंधळ, देविदास बांदल, देविदास जाधव, कैलास साबळे, गणेश डावरे, बाळासाहेब शिंदे, मनोहर शिंगोटे, सुरेश घुले, प्रकाश मोहन, प्रकाश गोपाळे, मारुती कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील मुंबई स्थित नागरिक उपस्थित होते.
अतुल देशमुख म्हणाले, खेड तालुक्यातील रोजगाराच्या संधी उपलब्ध असताना तालुक्यातील सहा हजार कुटुंबे काम मिळत नसल्याने मुंबईला गेली आहेत. हे येथील आमदारांची मान शरमेने खाली घालण्याचे लक्षण आहे. स्थानिकांना रोजगार देता आला नाही. उलट या दोन्ही आमदारांनी चाकण इंडस्ट्रीचा फायदा स्वत:साठी करून घेतला. गेल्या 15 वर्षांच्या काळात कोणतेच प्रश्न मार्गी लागले नाहीत. ज्यांना प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील जनतेने संधी दिली आणि परिवर्तन केले; मात्र त्यांनीच जनतेची जाण ठेवली नाही. म्हणून पुन्हा परिवर्तन केले पाहिजे. त्यासाठी हा शेतकऱ्याचा मुलगा तुमच्यासमोर उभा आहे. हक्काच्या माणसला साथ द्या निवडून द्या, आपले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना चाकण, खेड सिटी इंडस्ट्रीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन आप्पा आवारी तर, किसन आवारी यांनी आभार मानले
- चाकण उद्योगनगरीत मोठा रोजगार उपलब्ध
चाकण उद्योगनगरीत पाच टप्पे होत असताना मोठा रोजगार उपलब्ध आहे; मात्र आजी-माजी आमदारांच्या नातेवाइकांच्या ठेकेदारीने रोजगार परराज्यातील तरुणांना मिळत आहे. ही वस्तुस्थिती जनतेच्या लक्षात आल्याचे अतुल देशमुख यांनी स्पष्ट केले.