आमदार दत्तात्रय भरणे यांचे ग्रामसेवक संघटनेला आश्वासन
रेडा- गावचा विकास करण्यासाठी ग्रामसेवक हा सर्वात मोठा कणा आहे, हे शासनाने ओळखणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या घटकावर आंदोलन करण्याची वेळ कशासाठी आली, याचा जाब राज्य शासनाला विचारणार आहे. सर्व मागण्या मान्य होण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा, इंदापूर या ग्रामसेवक संघटनेच्यावतीने इंदापूर पंचायत समितीच्या आवारात संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी आमदार भरणे यांनी आंदोलकांची भेट घेतली.
आमदार भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील ग्रामसेवक बंधूंचा थोरला भाऊ म्हणून कायम मी ग्रामसेवकांच्या पाठीशी असतो या आंदोलनातही तुमच्या बरोबर आहे. यावेळी इंदापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवक संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. यामध्ये आठ मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रमुख मागण्यांमध्ये ग्रामसेवक व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती होणे. ग्रामसेवक संवर्ग प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता बदल होऊन पदवीधर ग्रामसेवक नेमणुका होणे. 2011च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सज्जे व पदे वाढ करणे, ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी वेतन त्रुटी दूर होणे. 2005 नंतरचे ग्रामसेवक यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवक राज्य /जिल्हास्तर/ आगाऊ वेतनवाढ एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती, ग्रामसेवक का कडील अतिरिक्त कामे कमी करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नीलकंठ गिरी व सचिव लक्ष्मीकांत जगताप तसेच यावेळी पदाधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष आकाश कांबळे त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य वासुदेव काळे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष महारुद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.